मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा!

| Updated on: Sep 23, 2020 | 11:01 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचं भरभरुन कौतुक केलं (PM Modi appreciate citizens of Maharashtra for fighting with Corona).

मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा!
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचं भरभरुन कौतुक केलं (PM Modi appreciate citizens of Maharashtra for fighting with Corona). ‘महाराष्ट्र के लोग बहादूर’ असं म्हणत महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करत असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. ते देशातील 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्राला काही टीप्सही दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील नागरिक बहादुरीने कोरोनाचा सामना करते आहेत. कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये विशेष पथकांची नियुक्ती करुन संसर्ग कमी करता येईल. यामुळे देशाच्या कोरोना आकडेवारीवरही परिणाम होईल.

पंतप्रधानांसोबतच्या या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणाच्या कामाची माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरुन परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करुन कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.”

ऑक्सिजन उत्पादन व वितरणावर नियंत्रण हवे

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत. आम्ही न थकता लढतो आहोत. आम्ही कदापि हरणार नाही. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे.”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस पुरवठ्याचे नियोजनही करायला हवे, अशी मागणी केली. ते म्हणाले, “लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी. तसेच या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.”

मुख्यमंत्र्यांकडून चष्म्याच्या सवयीचे उदाहरण देत मास्कविषयी जनजागृती

मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले, “पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार. तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार, पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.”

पंतप्रधानांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे उदाहरण इतकं आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात या उदाहरणाचा उल्लेख केला. तसेच पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असं सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी, त्यांनी घालविली काँग्रेसची सत्तेची गादी, संसदेत नव्या विधेयकाचे आठवलेंकडून काव्यमय स्वागत

PM Modi appreciate citizens of Maharashtra for fighting with Corona