लॉकडाऊन गांभीर्याने न घेणाऱ्या अतिशहाण्यांना मोदी-पवारांचे खडे बोल

| Updated on: Mar 23, 2020 | 1:08 PM

प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाची अति गांभार्याने नोंद घेऊन पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले (Narendra Modi on Lockdown)

लॉकडाऊन गांभीर्याने न घेणाऱ्या अतिशहाण्यांना मोदी-पवारांचे खडे बोल
Follow us on

नवी दिल्ली : बरेच जण अद्यापही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपया स्वत:ला सुरक्षित ठेवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. नागरिकांकडून नियम आणि कायद्यांचं पालन करुन घ्या, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना केली. (Narendra Modi on Lockdown)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘माझे नागरिकांना आवाहन आहे की अपरिहार्यता असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाची अति गांभार्याने नोंद घेऊन पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. ही लढाई आपण जिंकणारच, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेची!’ असं ट्वीट पवारांनी केलं आहे.

‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करुनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. वाहनांवरुन जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती ध्यानात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.’ असं पवारांनी सुनावलं. (Narendra Modi on Lockdown)

दरम्यान, जनता कर्फ्यूच्या दिवशी नरेंद्र मोदींनी ‘थाळीनाद’ करुन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याच्या पद्धतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जर आपण भीती आणि चिंतेच्या वातावरणात उत्सवासारखी परिस्थिती निर्माण केली असेल, तर असंच होणार. जर सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर असेल’ असा टोमणा मारला.