Covid 19 | पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्याच्या बैठकीतील महत्त्वाचे 20 मुद्दे

| Updated on: Apr 27, 2020 | 3:53 PM

पंतप्रधान मोदींची राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाबाबत ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स (PM Modi Video Conference With CM) होती. 

Covid 19 | पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्याच्या बैठकीतील महत्त्वाचे 20 मुद्दे
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चौैथ्यांदा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला (PM Modi Video Conference With CM). यावेळी देशातील लॉकडाऊननंतरच्या पुढील रणनितीबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींची राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाबाबत ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतावर कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. येत्या 3 मे रोजी लॉकडाऊन संपत असला तरी रेड आणि ऑरेंज झोनमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या राज्यात जास्त रुग्ण आहेत, त्या ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. तर ज्या राज्यात कमी रुग्ण आहे, त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार सूट दिली जाऊ शकते. याचा निर्णय प्रत्येक राज्यांनी घ्यावा,” असे मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना (PM Modi Video Conference With CM) सांगितले.

पंतप्रधान मोदींचा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद

1. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे 20 देश भारताबरोबर होते. ते आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. त्या ठिकाणी कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

2. आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. जनतेने देखील साथ दिली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतो आहे.

3. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.

4. आपल्या देशात अनेक विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यांना आणायचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे. त्यांच्या लगेच चाचण्या करुन क्वारांटाईन करणं गरजेचं आहे.

5. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करुन ठरवायचे आहे.

6. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा.“दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.

7. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा.

8. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे.

9. येत्या 3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली, तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

10. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.

11.  रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी गोष्टी राज्य सरकारने ठरवणे गरजेचे आहे.

12. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे संपर्क जास्तात जास्त तपासा.

13. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत.

14. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरुप बनवण्याची गरज आहे, असे झोन्स फुल प्रुफ करा

15. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.

16. कोरोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत.

17. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार आहे. गेल्या 20 एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली, पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.

18. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे.

19. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.

20. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.

तीन तास बैठक

या बैठकीला सकाळी 10.30 ला सुरुवात झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह इतर नेतेही सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन काही कारणास्तव या बैठकीला गैरहजर होते. जवळपास तीन तास ही बैठक सुरु होती.

संबंधित बातम्या : 

कोरोनाचं संकट कायम, लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय सर्वस्वी राज्यांचा : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद, लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता