आरोपीची माहिती दिली, पोलिसांनी बलात्कार झालाय हेच मान्य केलं नाही : पीडितेचा भाऊ

| Updated on: Aug 29, 2019 | 5:37 PM

मुंबईतील चुनाभट्टी परिसरात या मुलीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार झाला होता. पण यानंतर पीडित कुटुंबाचीच कशी आरोपीसारखी चौकशी करण्यात आली आणि किती त्रास दिला याबाबत पीडितेच्या भावाने सांगितलंय.

आरोपीची माहिती दिली, पोलिसांनी बलात्कार झालाय हेच मान्य केलं नाही : पीडितेचा भाऊ
Follow us on

मुंबई : मुलीवर बलात्कार होऊनही पोलिसांनी ते मान्य करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडितेच्या भावाने (Mumbai Gang rape) केलाय. दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर जालन्याच्या पीडितेने (Mumbai Gang rape) अखेर जगाचा निरोप घेतला. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात या मुलीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार झाला होता. पण यानंतर पीडित कुटुंबाचीच कशी आरोपीसारखी चौकशी करण्यात आली आणि किती त्रास दिला याबाबत पीडितेच्या भावाने सांगितलंय.

दीड महिन्यानंतरही नराधम अजून सापडलेले नाहीत. या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर चुनाभट्टी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात आलं. पण यापूर्वी पोलिसांनी कोणतीही दाद दिली नाही, असा दावा पीडितेच्या भावाने केलाय. शिवाय बहिणीवर डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाही, तिची जात विचारण्यात आली, असाही आरोप पीडितेच्या भावाने केलाय.

“पोलिसांनी ऐकून न घेता बाहेर काढलं”

“7 जुलैला घरात बहीण एकटीच होती. 8 तारखेला ती आजारी पडली, पण किरकोळ थंडी-ताप समजून त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण चार ते पाच दिवसात तिची नजर कमी झाली आणि हात-पाय निकामी झाले. अर्धांगवायू समजून तिला आयुर्वेदिक उपचारासाठी गावाकडे नेलं. 24 जुलैपर्यंत तिची प्रकृती खालावत गेली.

25 जुलैला तिला औरंगाबादला घाटीत दाखल करण्यात आलं आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलंय याचा तपास लागला. मुलीवर गंभीर हल्ला झाला असून तिला ड्रग देण्यात आले आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस वडिलांना चौकशीसाठी घेऊन गेले. 20 तास चौकशी केली. तरीही काही झालं नाही. नंतर चुनाभट्टीला केस वर्ग झाली.

दवाखान्यातील आवरुन इकडे आलोत तर सूर्य नावाचा अधिकारी होता, आरोपीचा नंबर, सगळी माहिती दिली तरी सूर्य नावाच्या अधिकाऱ्याने ‘तुला कुणी सांगितलं बलात्कार झालाय’, असं म्हणून मला बाहेर काढलं. आज सगळे लोक आले म्हणून बलात्कार झालाय हे पोलिसांनी मान्य केलं. त्या शिरके मॅडमने तर आईला एवढा त्रास दिला की आई आत्महत्या करत होती. आरोपीचे पुरावे, फोटो नंबर देऊन काही केलं नाही.

आरोपीने 8 जुलैला 53 फोन केले, मेसेज केला, काल जे झालं ते भावाला सांगितलं का, झालं ते विसरुन जा, असा तो मेसेज होता. 53 फोन कुणी करतं का? आरोपीचा फोटो देऊनही पोलीस पकडत नाहीत. यांना सरकार पगार कशाचा देतंय? आम्ही स्वतः आरोपी पकडून यांच्या ताब्यात द्यायचे का? तिथल्या जोशी डॉक्टरने मुलीची जात विचारली, त्या डॉक्टरवरही कारवाई व्हायला हवी, मुलीचा जबाब घेता येऊ नये म्हणून तिला उपचारादरम्यानच मारलंय, असा आमचा थेट आरोप आहे, अशी प्रतिक्रिया चुनाभट्टी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या भावाने दिली.

जवळपास दोन महिने मृत्यूशी झुंज

पीडित मुलगी ही मूळची जालना जिल्ह्याची रहिवासी आहे. पीडित महिलेचा भाऊ हा मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहत होता. भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती मुंबईत आली होती. 7 जुलैला भावाच्या मुलाला ताप आला म्हणून त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि गुंगीचं औषध देऊन चार जणांनी बलात्कार केला. जवळपास दोन महिने मरणयातना भोगून या पीडितेने न्यायाविनाच जगाचा निरोप घेतला.