पाथर्डीच्या शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची : प्रविण दरेकर

| Updated on: Mar 01, 2020 | 3:28 PM

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अहमदनगरमधील पाथर्डीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली.

पाथर्डीच्या शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची : प्रविण दरेकर
Follow us on

अहमदनगर : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अहमदनगरमध्ये पाथर्डी तालुक्यातील भरजवाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं (Pravin Darekar on Pathardi Farmer Suicide). यावेळी त्यांनी पीडित कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच भाजपकडून रोख 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही कुटुंबाला देण्यात आली. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला.

मल्हार बटुळे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचा मुलगा प्रशांतने बळीराजा आत्महत्या करू नको अशी भावनिक साद घालणारी कविता आपल्या शाळेत म्हटली होती. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज (1 मार्च) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील या कुटुंबाला भेट देत आधार दिला.


यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, “हा हृदय हेलावणारा प्रसंग आहे. सरकार कर्जमाफी करत असताना शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर विचार करणे गरजेचे आहे. सरसकट कर्जमाफी झाली असती, तर ही वेळ आली नसती. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्यामुळे ही आत्महत्या झाली आहे.”

इथं आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. आता अधिवेशनात या सरकारचा पर्दाफाश करू असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला. यावेळी या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही आमदार मोनिका राजळे यांचेमार्फत घेत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. ते म्हणाले, “ही कर्जमाफी सरसकट नाही. ठाकरे सरकारने सरसकट कर्जमाफी करू म्हणून सांगितलं. मात्र तसं झालं नाही. शेतकऱ्यांच्या जेवढ्या प्रकारचे कर्ज आहे, त्याला एकदम मोकळं करा. कर्जमाफी तात्पुरती करुन उपयोग होणार नाही.”

ठाकरे सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करताना दरेकर यांनी आपण भेट दिल्यानंतर आता उद्यापासून सर्वजण येतील, अशी टीकाही केली.

Pravin Darekar on Pathardi Farmer Suicide