कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरला अनेक लाभ मिळतील : राष्ट्रपती

| Updated on: Aug 14, 2019 | 9:11 PM

कलम 370 काढल्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना अनेक लाभ मिळतील, ज्यापासून ते आतापर्यंत वंचित होते, ते अधिकारही मिळतील, असं राष्ट्रपती म्हणाले. शिवाय तिहेरी तलाकसारखा शाप आता दूर झाल्याबद्दलही राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या मुलींना आता न्याय मिळेल आणि भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरला अनेक लाभ मिळतील : राष्ट्रपती
Follow us on

नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी देशाला संबोधित केलं आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढण्याचा जो निर्णय घेतला, त्याचंही राष्ट्रपतींनी (President Ramnath Kovind) समर्थन करत यामुळे समानतेला वाव मिळेल, असं सांगितलं. कलम 370 काढल्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना अनेक लाभ मिळतील, ज्यापासून ते आतापर्यंत वंचित होते, ते अधिकारही मिळतील, असं राष्ट्रपती म्हणाले. शिवाय तिहेरी तलाकसारखा शाप आता दूर झाल्याबद्दलही राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या मुलींना आता न्याय मिळेल आणि भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जम्मू काश्मीरबाबतच्या निर्णयाचं स्वागत

जम्मू आणि काश्मीरबाबत जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा फायदा होईल याचा विश्वास वाटतो. देशातील इतर नागरिकांना ज्या सुविधा आणि लाभ मिळत होते, ते सर्व लाभही या नागरिकांना आता मिळतील. समानता वाढवण्यासाठी असलेल्या कायद्यांचा आता वापर होईल. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे मुलांचं भविष्य आणखी उज्ज्वल होणार आहे. माहितीच्या अधिकारामुळे नागरिकांना सरकारच्या कामाबाबत माहिती मागण्याचा अधिकार मिळेल. पारंपरिक पद्धतीने वंचित असलेल्या लोकांना आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षणासोबतच इतर सुविधाही मिळतील, असं राष्ट्रपती म्हणाले.

स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो. प्रत्येक जण, मग तो देशात असो किंवा परदेशात, या दिवशी देशप्रेमाची भावना दाटून येते. आपण या दिवसाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपला 72 वर्षांचा हा प्रवास आता अत्यंत चांगल्या टप्प्यावर आलाय, असंही राष्ट्रपती म्हणाले.

राष्ट्रपतींच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे

  • संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत चांगलं कामकाज पार पडलं. राजकीय सहकार्यातून अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर झाली. येत्या पाच वर्षात अशाच पद्धतीने काम होईल याची अपेक्षा आहे आणि राज्याच्या विधानसभांनीही असंच काम करावं.

  • मतदार-लोकप्रतिनिधी, नागरिक-सरकार आणि समाज-प्रशासन यांच्यातील आदर्श भागीदारीतूनच देशाचा विकास होईल. या भागीदारीसाठी लोकांना समर्थ बनवण्याची जबाबदारी सरकारची आहे.

  • केंद्र सरकारकडून गरीबांना घर, स्वच्छता, वीज, पाणी या मुलभूत सुविधा देण्याचं काम स्तुत्य आहे. देशातील काही भागात पुरासारखी नैसर्गिक आपत्ती आहे. पण केंद्र सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा सदुपयोग करण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचं दिसतं. राज्य सरकार आणि प्रत्येक नागरिकाची यामध्ये मोलाची भूमिका राहिल.

  • रेल्वे यात्रा आणखी सुरक्षित आणि सर्व सुविधांसह मिळत आहे. मेट्रोचं जाळंही वाढत आहे. नवीन बंदरांचं काम सुरु आहे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, विमानतळे, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, बंदरे आणि अत्याधुनिक बनवली जात आहेत.

  • सामान्य व्यक्तीचं हित लक्षात घेता बँकिंग सुविधा आणखी पारदर्शी आणि सर्वसमावेशक बनली आहे. उद्योगपतींसाठी करव्यवस्था सुरळीत झाली. डिजीटल इंडियाच्या माध्यमातून सुविधा आणि माहिती लोकांपर्यंत जात आहे.

  • देशाच्या संपत्तीचं संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या पायाभूत सुविधा ही भारताची संपत्ती आहे. राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षणही महत्त्वाचं आहे आणि हे संरक्षण करणारे कर्तव्यनिष्ठ नागरिक देशप्रेमाचीच भावना व्यक्त करत असतात.

राष्ट्रपतींचं हिंदी भाषण जसंच्या तसं वाचण्यासाठी क्लिक करा