पुण्यात ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या, रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी

| Updated on: May 15, 2020 | 8:42 AM

स्वच्छतागृहात जाण्याचे कारण सांगून कोरोना संशयित रुग्ण खोलीबाहेर पडला. त्यानंतर रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन त्याने आत्महत्या केली. (Pune Corona Suspected Patient Commits Suicide)

पुण्यात कोरोना संशयिताची आत्महत्या, रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी
Follow us on

पुणे : पुण्यात ‘कोरोना’ संशयित रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन संशयित रुग्णाने आयुष्य संपवलं. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे. (Pune Corona Suspected Patient Commits Suicide)

बोपोडी भागात असलेले हे खासगी रुग्णालय सध्या पुणे महापालिकेच्या ताब्यात आहे. संबंधित तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले होते. दुपारी तपासणीसाठी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यानंतरही तो तणावग्रस्त होता.

रात्री नऊ वाजताच्या सुमारास तरुणाने स्वच्छतागृहात जाण्याचे कारण सांगितले आणि तो खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन त्याने आत्महत्या केली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्याने अविचारी निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याआधी अकोल्यातही कोरोनाग्रस्त रुग्णाने गळ्यावर ब्लेडने वार करुन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.

‘कोरोना’ बरा होतो!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ ‘कोरोना’ बरा होत असल्याची शाश्वती देतात. महाराष्ट्रात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यातच नवे रुग्ण सापडण्याच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्वदी पार केलेल्या किंवा कर्करोगासारख्या व्याधी जडलेल्या रुग्णांनीही कोरोनाला ‘टफ फाईट’ देऊन विजय मिळवला आहे.

हेही वाचा : पुण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, नऊ दिवसात 411 रुग्णांना डिस्चार्ज

‘कोरोना’ झाला म्हणजे सगळं संपलं, हा गैरसमज असल्याचं उद्धव ठाकरे अनेक वेळा आपल्या संबोधनात सांगतात. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने किंवा कोरोना झाल्यासही रुग्णांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, असे पुन्हा एकदा आवाहन केले जात आहे.