‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’

| Updated on: Oct 06, 2020 | 1:23 PM

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत वादग्रस्त कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. यावरुन संसदेत घडलेल्या रणकंदनात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता.

...म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो
Follow us on

पटियाला: संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी माझ्या आईला वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात नेणे गरजेचे होते. त्यामुळेच कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित राहू शकलो नाही, अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत वादग्रस्त कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. यावरुन संसदेत घडलेल्या रणकंदनात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मात्र, अशावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते परदेशात का जाऊन बसले होते, असा सवाल शिरोमणी अकाली दलाने उपस्थित केला होता. (Rahul Gandhi explain why he was aboroad when farm bills were passed)

या टीकेला राहुल गांधी यांनी मंगळवारी पटियाला येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, त्यावेळी माझ्या आईला वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जावे लागले. माझ्या बहिणीच्या (प्रियांका गांधी) कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ती आईसोबत जाऊ शकत नव्हती. त्यामुळेच मी आईसोबत परदेशात गेलो. शेवटी मी तिचा मुलगा आहे आणि मला तिची काळजी घेतलीच पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.


सध्या संसदेने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. हे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. यामुळे बाजार समित्या मोडीत निघतील व शेतकऱ्यांना हमीभाव देणारी कोणतीही यंत्रणाच अस्तित्त्वात राहणार नाही. त्यामुळे शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधले जातील, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

राहुल गांधी यांनीही आजच्या पत्रकारपरिषदेत नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवले. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे अन्नसुरक्षेची प्रचलित रचना मोडीत निघेल. याचा सर्वाधिक फटका पंजाबला बसेल. हा शेतकऱ्यांवर झालेला हल्ला आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसने काढलेल्या ‘शेती बचाओ यात्रे’चा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी पंजाबच्या संगरुर ते भवानीगढपर्यंत काँग्रेसकडून ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली होती. राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात कृषी विधेयक कायदा लागू होणार नाही, काँग्रेस नेते राजीव सातव यांचा इशारा

(Rahul Gandhi explain why he was aboroad when farm bills were passed)