मनसेची मराठवाड्यात पहिलीच मोठी बैठक, 1500 पदाधिकारी येणार, राज ठाकरेंना काय खुणावतंय औरंगाबादेत?

| Updated on: Dec 14, 2021 | 6:30 AM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादमध्ये आयोजित केली आहे. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

मनसेची मराठवाड्यात पहिलीच मोठी बैठक, 1500 पदाधिकारी येणार, राज ठाकरेंना काय खुणावतंय औरंगाबादेत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादेत जंगी स्वागत
Follow us on

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal corporation) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक आज औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मराठवाडास्तरीय बैठक घेण्यात येत आहे. काल संध्याकाळी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) जंगी स्वागत औरंगाबादमध्ये करण्यात आले. तत्पूर्वी शहरभर मनसेच्या वतीने मोठ-मोठे होर्डिंग्जदेखील झळकवण्यात आलेत. मुस्लिम बहुल भागातील या होर्डिंग्जवर ‘जय श्रीराम’ चा नारा दिला जातोय, त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करणार का, या चर्चांनाही  उधाण आलं.  काल दिवसभर याचीच चर्चा शहरात होती. वातावरणनिर्मिती तर झालीय, आता बैठकीत नेमकं काय घडतंय, याची उत्सुकता लागलीय..

पहिलीच मराठवाडा स्तरीय बैठक, 1500 पदाधिकारी

निमित्त महापालिका निवडणुकीचे असले तरीही संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाळे मजबूत करण्याकरिता राज ठाकरे यांनी राज्यभरात दौरे आयोजित केले आहेत. यापूर्वी जिल्हा स्तरावर बैठका झाल्या. पण मनसेने स्थापनेनंतर प्रथमच मराठवाडा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि तालुक्यांतील तब्बल 1500 पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.

मनसेची औरंगादमधील सध्याची स्थिती काय?

2015 मधील महापालिका निवडणुकीत मनसेचा एकही नगरसेवक नाही. कारण मनसेने ही निवडणूक लढवलीच नव्हती. त्यापूर्वी म्हणजेच 2010 च्या महापालिकेत मनसेने पहिल्यांदाच खाते उघडले होते. त्यात राज गौरव वानखेडे हे नगरसेवक निवडून आले. मात्र 2014 च्या लोकसभेतील मोदी लाटेचा प्रभाव पडला आणि पालिका बरखास्त होण्याच्या आतच हे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे महापालिकेत मनसेचा माजी म्हणायलाही नगरसेवक उरलेला नाही.

हिंदुत्वाचा मुद्दा असूनही औरंगाबादेत का रुजली नाही?

राजकीय जाणकारांच्या मते, मनसेला अजूनही औरंगाबादमध्ये आपलं स्थान बळकट करता आलेलं नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे अंतर्गत कुरघोडी. इथली मनसे अजूनही गटतटांमध्ये विभागलेली आहे. हिंदुत्ववादी संघटना असूनही येथील संघटनाबांधणी मनसेला करता आलेली नाही. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचं स्थानिक राजकारणात म्हणावं तितकं लक्ष नाही, तसा दबदबा नाही. किंबहुना मनसेला इथे त्या तोडीचं सक्षम असं नेतृत्व मिळालेलं नाही.
नुकतंच उदाहरण घेतलं तर राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांना फोडण्यात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांना यश आलंय. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेण्यात आलाय. सध्याच्या स्थितीत मनसेसाठी हा मोठा धक्काच आहे. स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी हे मनसेसमोरील मोठं आव्हान आहे.

औरंगाबादेत यंदा मनसेला सुवर्णसंधी!

नाशिकच्या तुलनेत मराठवाड्यात आणि विशेषतः औरंगाबादमध्ये मनसे रुजलेली नसली तरीही यंदाच्या महापालिका निवडणुकीत पक्षाला इथे चांगलाच हात मारता येईल, अशी स्थिती आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादची जनता यंदा पक्षावर नाराज आहे. रखडलेली पाणी योजना, भरभक्कम पाणीपट्टी, आठवडाभरानी होणारा पाणीपुरवठा, गुंठेवारी, मंद गतीने सुरु असलेली रस्त्याची कामे, त्यामुळे गल्लोगलीतल्या नागरिकांचे हाल, आदी बऱ्याच कारणांमुळे जनता वैतागलेली आहे. त्यामुळे शिवसेनेवर जनता नाराज आहे. याउलट केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आणि मंत्रीपदावरील नेत्यांनी बराच निधी आणल्याने भाजप हा तगडा पर्याय ठरू शकतो.  इथल्या जनतेनं कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला भक्कम पर्याय मानलेलं नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यानं भाजप आणि शिवसेनेची युती होणे कठीण आहे. त्यामुळे मनसेनं स्वबळावर उमेदवार उभे केले किंवा भाजपसोबत युती केली काय, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जनता मनसेकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहू शकते. अशा अनेक संधी औरंगाबादेत दडलेल्या आहेत. फक्त याचं सोनं करणं स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनं कसं जमेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या-

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नको, नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट, उद्याच्या सुनावणीकडे लक्ष

मुंबई महापालिकेत शिवसेना, काँग्रसेसोबत युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘या’ दोन पक्षांसोबत केली आघाडी

MIM खासदार इम्तियाज जलील यांची सरकारला ऑफर, मुस्लिम आरक्षण दिलं तर महापालिका निवडणुका लढणार नाही!