राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: पाकिस्तानला कोणते पुरावे हवेत?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी टीव्ही 9 शी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारची भूमिका, पाकिस्तानचा बंदोबस्त, भारताची रणनीती याबाबत राजनाथ सिंह यांनी उत्तरं दिली. राजनाथ सिंह यांची ही मुलाखत टीव्ही 9 मराठीवर आज बुधवारी संध्याकाळी पाहू शकाल. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांची ही पहिली मुलाखत आहे. […]

राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: पाकिस्तानला कोणते पुरावे हवेत?
Follow us on

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी टीव्ही 9 शी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारची भूमिका, पाकिस्तानचा बंदोबस्त, भारताची रणनीती याबाबत राजनाथ सिंह यांनी उत्तरं दिली. राजनाथ सिंह यांची ही मुलाखत टीव्ही 9 मराठीवर आज बुधवारी संध्याकाळी पाहू शकाल.

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांची ही पहिली मुलाखत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत काय ठरलं?  पाकिस्तानवर दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे का? कसा घेणार पुलवामाचा बदला? अशा प्रश्नांना राजनाथ सिंह यांनी उत्तरं दिली.

निर्णायक लढाईची वेळ

पुलवामा हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विचारण्यात आलं. त्याबाबत राजनाथ सिंह म्हणाले, “दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांना दहशतवादाविरोधात एकत्र येणं गरजेचं आहे”

इंडियन आर्मीचे संकेत

यावेळी राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यदलाने संकेत दिल्याचं नमूद केलं. जो कोणी बंदूक उचलेल, त्याला ठार करण्यात येईल, असं आर्मीने ठणकावलं आहे. यापेक्षा मोठा संकेत काहीही असू शकत नाही. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थेट इशारा दिला आहे. त्यामुळे देशातील जनतेला त्यावर विश्वास आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

देशाच्या जनतेचा विश्वासघात होणार नाही

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, “अधिक स्पष्ट बोलणे उचित ठरणार नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही सांगितलं आहे, त्यावर जनतेचा विश्वास आहे. देशाच्या जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, हाच प्रयत्न असेल”

पुलवामा हल्ल्याचा निषेध न करणाऱ्या इम्रान खानवर विश्वास कसा?

यावेळी राजनाथ सिंहांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला. ज्या पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

त्यांना जे काही बोलायचं होतं ते त्यांनी बोलून दाखवलं, मात्र आम्ही जो विचार केला आहे, जे सांगितलं आहे त्यावर जनतेचा विश्वास आहे, असं राजनाथ यांनी नमूद केलं.

पाकिस्तानी मंत्री दहशतवाद्यांसोबत

पाकिस्तानी मंत्री दहशतवाद्यांसोबत दिसतात त्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा, असं राजनाथ म्हणाले.  26/11 हल्ल्याचे अनेक पुरावे दिले, उरी हल्ल्याचे पुरावे दिले. या हल्ल्याचे मास्टरमाईंड पाकिस्तानात आहेत. हे त्यांनाही माहीत आहे, असं राजनाथ यांनी सांगितलं.

इम्रान खान यांचं कातडीबचाव धोरण

राजनाथ सिंह यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “इम्रान खान हे कातडीबचाव धोरण स्वीकारत आहेत. आम्ही निर्दोष आहोत हे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा हा डाव केवळ भारतच नाही तर सर्व दुनिया ओळखून आहे. जगाला माहिती आहे की दहशतवादाबाबत जे काही होत आहे, त्यामध्ये पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका आहे, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.

सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानात आसरा दिला जातो. तिथूनच सगळ्या घडामोडी घडतात.  मात्र आम्ही आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं राजनाथ यांनी सांगितलं.

चौकशी सुरु

सध्या या संपूर्ण घटनेचा तपास सुरु आहे. पुलवामा हल्ल्याची चौकशी NIA करत आहे. हा चौकशी अहवाल समोर आल्यानंतर सर्व बाबी उघड होतील, असं राजनाथ म्हणाले.

दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई

जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं, मात्र प्रतिसाद मिळत नाही. आता जे काही करायचं आहे ते भारत सरकार करेल, असं त्यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या वक्तव्याचं स्वागत

याप्रकरणी अमेरिकेने भारताला पाठिंबा देत, पाकिस्तानची कानउघडणी केली होती. तसंच भारताला स्वरक्षणाचा संपूर्ण अधिकार आहे असं अमेरिकेने म्हटलं होतं. त्यावर राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या वक्तव्याचं स्वागत केलं.

बाहेरील दहशतवादी

जे दहशतवादी आहेत ते परदेशी भूमीवरचे आहेत, ते सर्वच काही भारताच्या भूमीवरचे नाहीत. काही काश्मिरींचा समावेश असू शकतो. मात्र बाहेरील दहशतवादी नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे, असं राजनाथ म्हणाले.

.. म्हणून पार्थिवाला खांदा दिला

माझ्या अंतर्मनामुळेच मी शहिदांच्या पार्थिवाला खांदा दिला. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या पार्थिवाला खांदा देणं माझी नैतिक जबाबदारी आहे, असं राजनाथ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

काश्मिरी तरुणांनो शेवटचं सांगतो, बंदूक सोडा अन्यथा ठार करु: इंडियन आर्मी  

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!  

शहीद मेजर विभूतींच्या पार्थिवाला स्पर्श करुन वीरपत्नी म्हणाली – ‘I Love You’