राखी सावंत चाळिशीत बोहल्यावर, भेटीनंतर 15 दिवसात NRI तरुणाशी लग्न

अभिनेत्री राखी सावंतने रितेश नावाच्या एनआरआय तरुणासोबत लग्न केल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर फोटो टाकून तसे संकेत देत होती.

राखी सावंत चाळिशीत बोहल्यावर, भेटीनंतर 15 दिवसात NRI तरुणाशी लग्न
Anish Bendre | Updated on: Aug 05, 2019 | 9:16 AM

मुंबई : ड्रामा क्वीन अशी ख्याती असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कायम कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असते. यंदा निमित्त ठरलं आहे तिच्या लग्नाचं. मुंबईतील जे डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये आपण गुपचूप लग्न केल्याची कबुली राखी सावंतने दिली आहे. रितेश नावाच्या एनआरआय तरुणासोबत राखी वयाच्या 40 व्या वर्षी बोहल्यावर चढली.

गेल्या काही दिवसांपासून राखी सोशल मीडियावर नववधूच्या पोशाखातील फोटो पोस्ट करत आहे. हातातील चुड्यावर (पंजाबी पद्धतीनुसार हातात भरल्या जाणाऱ्या बांगड्या) रितेश असं लिहिलेलं नाव खोडून तिने फोटो टाकले होते. मात्र चाणाक्ष चाहत्यांनी ते ओळखण्याची हुशारी दाखवली. सुरुवातीला, हे ब्रायडल फोटोशूट असल्याचा कांगावा करणाऱ्या राखीने आपण विवाहबंधनात अडकल्याचं मान्य केलं.

आपला पती रितेश हा यूकेमध्ये स्थायिक असल्याचं तिने सांगितलं. व्हिसा मिळाल्यानंतर आपणही यूकेमध्ये जाणार आहोत, असं राखी सांगते.

फिल्मी लव्ह स्टोरी

राखी सावंतच्या दाव्यानुसार तिची लव्ह स्टोरी तिच्याइतकीच फिल्मी आहे. रितेशने माझी पहिली मुलाखत टीव्हीवर पाहिली होती. इंटरव्ह्यू पाहूनच तो माझा चाहता झाला. त्याच्याबद्दल माहिती मिळताच मी ‘जिजस’कडे प्रार्थना केली, की मला त्याची पत्नी होण्याचं भाग्य मिळू दे. ती इच्छा तर पूर्ण झाली. माझ्यावर इश्वराची कृपा आहे, असं राखीने सांगितलं.

‘रितेश माझा फॅन झाल्यामुळे मला व्हॉट्सअॅप मेसेज करायचा. आमच्या गप्पा वाढल्या आणि लवकरच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. या गोष्टीला वर्ष झालं असेल. माझ्या एका मित्राशी लग्न करशील का? असा प्रश्न रितेशने मला विचारला. पण मी नकार दिला’ असं राखी म्हणाली.

दिल में घंटी बजी

‘मी त्याला म्हणाले, की तुझ्या मित्राला बघून माझ्या हृदयात घंटी वाजत नाही. त्यावर तो लगेच म्हणाला, मग माझ्यासाठी वाजते का? मी त्याच्याकडे विचार करण्यासाठी वेळ मागितला. वेळ गेला, तसं मला जाणीव झाली, की मी रितेशच्या प्रेमात पडले आहे. ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया होती.’ असं राखीने सांगितलं

लग्नाच्या केवळ 15 दिवस आधी आमची भेट झाली. मी योग्य व्यक्तीची निवड केल्याची खात्री त्याची भेट झाल्यावर मला पटली, असंही राखी म्हणते.

‘रितेशला खाजगी आयुष्य जगजाहीर करण्याची आवड नाही. त्याला मीडियासमोर येण्याची इच्छा नाही. तो एक बिजनसमन आहे.’ अशी माहिती राखीने दिली.

राखी का स्वयंवर

2009 साली राखी सावंत ‘राखी का स्वयंवर’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या रिअॅलिटी शोच्या फॉर्मेटनुसार तिने महाअंतिम फेरीत विजेत्यासोबत लग्न करणं गरजेचं होतं. महाअंतिम फेरीत सहभागी झालेल्या तिघा तरुणांपैकी इलेश पुंजरवालाची निवड तिने केली. मात्र लग्नास तयार नसल्याचं सांगत औपचारिकता म्हणून तिने केवळ साखरपुडा उरकला होता.

काही काळानंतर मात्र दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं. मी बॉलिवूड नृत्यांगना म्हणून करिअर सोडून कॅनडामध्ये त्याच्यासोबत स्थायिक व्हावं, अशी त्याची इच्छा होती, असं सांगत राखीने इलेशला अलविदा केलं. त्यानंतर मीडियामध्ये राखीने पैशांसाठी तर इलेशने प्रसिद्धीसाठी हा शो केला होता, असा दावा करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us