नाणारनंतर आता एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ठिणगी, रत्नागिरीतील ग्रामस्थ आक्रमक

| Updated on: Dec 11, 2019 | 3:40 PM

कोकणात नाणार प्रकल्पानंतर आता आणखी एका एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ठिणगी पडली आहे (Ratnagiri citizens are opposing MIDC project).

नाणारनंतर आता एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ठिणगी, रत्नागिरीतील ग्रामस्थ आक्रमक
Follow us on

रत्नागिरी : कोकणात नाणार प्रकल्पानंतर आता आणखी एका एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ठिणगी पडली आहे (Ratnagiri citizens are opposing MIDC project). आक्रमक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध म्हणून थेट ग्रामपंचायतींचे ठरावच सादर केले आहेत. वाटद, कळझोंडी आणि कोळीसरे गडनरळ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन त्यात एमआयडीसीला विरोध असल्याचे ठराव संमत केले. हे ठराव घेवून तिन्ही ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ एमआयडीसीच्या कार्यालयावर धडकले. ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळाने संबंधित एमआयडीसी रद्द करावी, अशी मागणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे (Ratnagiri citizens are opposing MIDC project).

संबंधित एमआयडीसी प्रकल्पासाठी 978 हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी घेतली जाणार आहे. जनसुनावणी न घेताच जमीन अधिग्रहणाच्या नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एमआयडीसीकडून प्रकल्पाविषयीच्या नोटीस देण्यापूर्वीच 30 ते 40 टक्के परप्रांतिय लोकांनी जमिन अधिग्रहण केली. त्यानंतर त्यांनीच प्रकल्प आणायला हरकत नसल्याचं प्रशासनाला कळवलं. म्हणूनच वाटद परिसरातील ग्रामपंचायतीने या प्रकल्पाविरोधात ठरवा केले आहेत.

“प्रकल्पाआधीच जमीन खरेदी करणाऱ्या प्ररप्रांतियांची एसआयडी चौकशी करा”

स्थानिक नागरिकांनी जमीन खरेदी करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी लवकरच ग्रामस्थांचे एक शिष्ठमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी करणार आहे. या एमआयडीसीला आपला संपूर्ण विरोध दाखवण्यासाठी आज (11 डिसेंबर) एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ग्रामसभेतील विरोधाचे ठराव आणि निवेदन देण्यात आले. तीन ग्रामपंचायतींनी अधिकृतपणे एमआयडीसी रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे नाणार ऑईल रिफायनरी पाठोपाठ आता आणखी एका एमआयडीसीच्या प्रकल्पाच्या विरोधात कोकणकर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.