पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग

| Updated on: Sep 24, 2019 | 6:59 PM

रत्नागिरीत 82 वर्षांच्या आजोबांची आणि त्यांची पंच्चाहत्तरी गाठलेल्या पत्नीवर मोठे संकट कोसळले आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेतील (RBI restrictions on PMC Bank) अनियमिततेमुळे आरबीआयने या बँकेवर निर्बंध टाकल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग
Follow us on

रत्नागिरी: अनेक लोक आयुष्यभर काबाड कष्ट करतात. म्हातारपणाची सोय म्हणून पैन पै वाचवून मोठ्या विश्वासाने बँकेत (Bank Saving) जमा करतात. मात्र, हीच रक्कम जेव्हा सरकारी धोरणातील (Government Policy) लकव्याचा बळी ठरते तेव्हा अशा वयोवृद्ध दाम्पत्याची अवस्था काय असेल याची कल्पना केलेलीच बरी. रत्नागिरीत 82 वर्षांच्या आजोबांची आणि त्यांची पंच्चाहत्तरी गाठलेल्या पत्नीचीही अवस्था अशीच काहीशी झाली आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेतील (RBI restrictions on PMC Bank) अनियमिततेमुळे आरबीआयने या बँकेवर निर्बंध टाकल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

रत्नागिरीतील श्रीपाद ढोले यांनी तब्बल 66 वर्ष किर्तन करून एक एक रुपयाची बचत केली. त्यांनी ही आयुष्याची पुंजी म्हातारवयात उपयोगी पडावी म्हणून पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत (PMC Bank) गुंतवली. ढोले कुटुंबीय तब्बल 8 लाख रुपयांच्या बचतीच्या व्याजावर आपलं आयुष्य ढकलत होते. मात्र, पीएमसी बँकेच्या चुकीच्या आर्थिक कामाने रत्नागिरीतील ढोले कुटुंबासमोर आता काळा कुट्ट अंधार आहे.

‘आर्थिक मंदीत मुलगाही बेरोजगार झाला’

श्रीपाद ढोले यांच्या एका मुलाची नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे, तर दुसऱ्या मुलाची 2 महिन्यांपूर्वीच मंदीत नोकरी गेली. त्यात महिन्याभरावर त्यांच्या डोळ्याचं आणि स्टोनचं ऑपरेशन अशा दुदैवाच्या फेऱ्यात ढोले अडकले. पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारातील अनियमिततांमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे हे वयोवृद्ध दाम्पत्य आगीतून फुफाट्यात पडले आहेत.

‘आरबीआयच्या 6 महिन्यांसाठीच्या निर्बंधाने दैनंदिन जगणेही कठिण’

श्रीपाद ढोलेंनी 66 वर्ष किर्तन केले. त्यांनी कितर्नातून कमावलेली जवळपास 8 लाखांची सर्वच्या सर्व पुंजी रत्नागिरीच्या पीएमसी बँकेत गुंतवली. त्यानंतर तरी आपले उरलेले म्हातारपणातील जगणे सुखासमाधानी जाईल अशी आशा लावून बसलेल्या ढोले दाम्पत्याला धक्का बसला. ते मागील 3 वर्षांपासून याच रकमेच्या व्याजावर काटकसर करून आपली गुजराण करत होते. पत्नी सुकांता यांनीही काबाड कष्ट करत पतीला आर्थिक हातभार लावला. यानंतर श्रीपाद आणि सुकांता यांनी आपली सर्व बचत मुलगा योगेशसोबत जॉईंट अकाऊंटवर बँकेत ठेवली. मात्र, आरबीआयने या बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. याचा थेट परिणाम आयुष्याच्या अखेरच्या दिवसात या दाम्पत्यावर झाले.

‘संकटाच्या वेळी हक्काची कमाई देखील गमावली’

श्रीपाद ढोले यांच्या कुटुंबावर एकामागोमाग नियती आघात करत आहे. मुलाची बायपास सर्जरी झाली आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांचा धाकटा मुलगा योगेशची 2 महिन्यांपूर्वीच आर्थिक मंदीमुळे बांधकाम क्षेत्रातील नोकरी गेली. त्यामुळे तोही घरात बेरोजगार बसला आहे. त्यात ढोले यांच्या डाव्या डोळ्याचं मोती बिंदूचं आणि तात्काळचं मृतखड्याचं ऑपरेशन आलं. अशा संकटाच्या वेळी त्यांची हक्काची ठेवही मिळत नसल्याने त्याच्या जीवाला घोर लागला आहे. या साऱ्यासाठी पैसे कुठून आणावे हा मोठा प्रश्न या कुटुंबाला सतावतो आहे. आपल्या हक्काचे पैसे गरजेच्या वेळी मिळत नाही. त्यामुळे हे दाम्पत्य अगदी अगतिक झालं आहे.

अशा एकूणच परिस्थितीत ढोले दाम्पत्य औषधांसह घरखर्चालाही महाग झाले आहेत. आयुष्यभर कष्ट उपसूनही अखेरच्या काळात या वयोवृद्ध दाम्पत्याला हालअपेष्टाच सोसाव्या लागत आहेत. यात आयुष्यभराची कष्टाची कमाई हिरावली जात असेल, तर मग जगायचं कसं आणि कुणासाठी हा यक्ष प्रश्न या दोघांसमोर उभा राहिला आहे. याला जबाबदार कोण आणि यातून कोण मार्ग काढणार असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.