भारताच्या भेदक माऱ्याला आमचे फलंदाज घाबरले, रिकी पॉन्टिंगचा स्ट्रेट ड्राईव्ह

| Updated on: Dec 29, 2020 | 7:42 PM

टीम इंडियाच्या शिलेदारांनी बॉक्सिंग डे टेस्टमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली.

भारताच्या भेदक माऱ्याला आमचे फलंदाज घाबरले, रिकी पॉन्टिंगचा स्ट्रेट ड्राईव्ह
Follow us on

मेलबर्न : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (AUS vs IND, 2nd Test) मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात (Boxing Day Test) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 70 धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांनी अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. टीम इंडियाने या सामन्यात सर्वच आघाडीवर धमाकेदार कामगिरी केली. भारताच्या या विजयामुळे कालपर्यंत (पहिल्या सामन्यातील दारूण पराभवामुळे) टीम इंडियावर टीका करणारे भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. तर अनेकांनी कांगारुंच्या संघालाही आरसा दाखवला आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचाही समावेश आहे. (Ricky Ponting slams Australian batsmen for lacking intent against Indian bowlers)

रिकी पॉन्टिंगने कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर तोंडसुख घेतलं आहे. क्रिकेट.कॉम.एयूशी बोलत असताना पॉन्टिंग म्हणाला की, संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद होण्याची भीती दूर करावी लागेल. ऑस्ट्रेलियाने तिथे (अॅडलेड) 191 आणि इथे (मेलबर्न) पहिल्या डावात 195 तर दुसऱ्या डावात 200 धावाच केल्या. ही कसोटी क्रिकेटमधील फलंदाजी नाही. या खेळाडूंना धावा बनवतानाही खूप वेळ लागला, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या फलंदाजांनी थोडी हिंमत दाखवायला हवी. बाद होण्याची भीती बाळगून चालणार नाही. निर्भीड होऊन मैदानात उतरायला हवं, भारतीय गोलंदाजांचा सामना करायला हवा. तसेच त्यांनी 2.5 रन प्रति ओव्हर या रनरेटपेक्षा अधिक जलद धावा काढायला हव्यात.

पॉन्टिंगकडून रहाणेचं कौतुक

या सामन्यात काल (सामन्याच्या दुसऱ्या दिवशी) शतक झळकावणाऱ्या हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेचं रिकी पाँटिंगने कौतुक केलं आहे. पाँटिंग म्हणाला की, “अ‌ॅडलेड कसोटीमध्ये ऐतिहासिक पराभव झाल्यानंतर भारतीय खेळाडूंचं मनोबल खचलं होतं. मात्र अजिंक्य रहाणेने विराटच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटीत भारतीय खेळाडूंचं मनोबल तर वाढवलंच परंतु त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ करुन घेतला. मनाने तुटलेल्या भारतीय खेळाडूंची त्याने उमेद जागवून त्यांना विजयाचं स्वप्न दाखवलं. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचं आव्हान जिवंत ठेवण्यात रहाणेने महत्त्वाची भूमिका निभावली.

भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘विराट’ विजय, कोहलीचं खास ट्विट

नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाने नमवलं आहे. साहजिकच अजिंक्य रहाणेवर दिग्गज खेळाडू कौतुकाचा वर्षाव करत आहेत. विराट कोहलीनेही भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराटने ट्विट करत म्हटलंय, “भारतीय टीमने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि विजय मिळवला. भारतीय खेळाडू आणि खासकरून अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल मला विशेष आनंद आहे. यानंतर भारतीय संघाची कामगिरी अधिक सरस असेल”.

कर्णधार अजिंक्य रहाणेंचं झुंजार शतक, रविंद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारुंना आठ विकेट्सने नमवून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. अजिंक्यच्या मॅचविनिंग खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा तिसऱ्या कसोटीबाबत मोठा निर्णय

रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचं मोठं विधान

रहाणेचं शतक म्हणजे विजयाची हमी, आकडेवारी हेच सांगते!

(Ricky Ponting slams Australian batsmen for lacking intent against Indian bowlers)