Sangli Boat Overturn : सांगली बोट दुर्घटना : बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला, बोट पलटली, नेमकं काय झालं?

| Updated on: Aug 08, 2019 | 6:01 PM

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ब्रह्मनाळ या गावात बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली.

Sangli Boat Overturn : सांगली बोट दुर्घटना : बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला, बोट पलटली, नेमकं काय झालं?
Follow us on

Sangli Boat Overtrun सांगली :  सांगलीमध्ये महापूर (Sangli Flood) आल्यामुळे थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ब्रह्मनाळ या गावात बोट उलटून (Brahmanal Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली. बुडालेली बोट ग्रामपंचायतीची असल्याचं सांगण्यात येत आहे.

सांगलीतील 4 तालुक्यांना पुराचा वेढा आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पाणी शिरलं होतं. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

नदीपात्रापासून दीड किलोमीटरपर्यंत 15 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. ब्रह्मनाळमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होतं. ब्रह्मनाळ आणि वसगडे या गावांचा प्रवास ग्रामपंचायतीची  नावेने केला जातो.  वर्षभर इथली वाहतूक अशाच पद्धतीने होते. पुरामुळे या भागात सध्या वीजेचे खांब, मोठ मोठी झाडं शेंड्यापर्यंत बुडाली आहेत. त्यामुळे नेमकी बोट कुठल्या दिशेने न्यायची हेच लक्षात आलं नसावं. ग्रामपंचायतीच्या  बोटीतून नेहमी वाहतूक होत असली तरी पुराच्या पाण्याने मार्ग समजण्यास अडथळा येत होता.

मंदीर, झाड, कठडे पाहून अंदाजाने मार्गक्रमण सुरु होते. त्यावेळी बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात पलटी झाली. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. खासगी बोटीत तशी व्यवस्थाच नव्हती. नियमित सवयीप्रमाणे ही बोट नेली जात होती. 

पाण्याची स्थिती इतकी भीषण आहे की बोट पलटी होताच अनेक जण वाहून गेले. मोठी झाडं पाण्यात गेलेत, वीजेचे खांब पाण्यात गेलेत त्यामुळे जायचं कुठं हेच कळत नव्हतं.  बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला आणि बोट पलटली.

या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 9 मृतदेह हाती लागले आहेत तर 5 जणांचा शोध सुरु आहे.

तहसिलदारांची प्रतिक्रिया

बोटीच्या पंखात कचरा अडकल्यामुळे बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती आहे, असं पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितलं. संबंधित बोट ग्रामपंचायतीची असून ती नियमितपणे प्रवासासाठी वापरली जात असल्याचंही पोळ यांनी सांगितलं.

कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे.

सांगली जिल्ह्यातील 70 हजार नागरिक आणि 21 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे.

एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि कोस्टगार्डच्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या 

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू