सांगलीत आयर्विन पुलावर 150 जण अडकले, पाणीपातळी 57 फुटांवर पोहचल्याने भीती

| Updated on: Aug 09, 2019 | 8:08 AM

सांगलीवाडीमध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांचं स्थलांतर करताना पाणीपातळी वाढल्यामुळे 150 जण सांगलीतील आयर्विन पुलावर अडकून पडले आहेत.

सांगलीत आयर्विन पुलावर 150 जण अडकले, पाणीपातळी 57 फुटांवर पोहचल्याने भीती
Follow us on

सांगली : सांगलीत आलेल्या महापुराने (Sangli Flood) स्थानिक नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडवली आहे. सांगलीवाडी भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी निघालेले 150 जण आयर्विन पुलावर (Irwin Bridge) अडकून पडले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचं प्रमाण अधिक असून पूरग्रस्तांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत असल्याची माहिती आहे.

आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 57 फुटांवर पोहचली आहे. पुलाच्या पूर्वेला असलेल्या टिळक चौक, तसंच पश्चिमेला असलेल्या सांगलीवाडी भागातही मोठ्या प्रमाणावर महापुराचं पाणी साचलं आहे. त्यामुळे पूरग्रस्तांची परिस्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.

प्रशासनाने तात्काळ यंत्रणा न राबवल्यास विपरित परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पूरग्रस्तांकडे जेवण आणि पाण्याची सोय नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे.

पुलावरच थांबा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

पूरग्रस्तांनी पुलावरच थांबावं, पाण्यात उतरु नये, पाणी पातळी वाढणार नाही, यासाठी आम्ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिलं आहे. सकाळपर्यंत सांगलीवाडीत मदतकार्य पोहचेल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी काल (गुरुवारी) रात्री दिली होती.

प्रशासनाची बोट पाठवली, महापौरांचा दावा

शासनाने काल सकाळी 11 वाजता बोट पाठवली होती, मात्र ती सांगलीवाडीपर्यंत पोहचू शकलेली नाही, असा दावा सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी केला. सांगलीवाडीतील पूरग्रस्त सरकारच्या बोटीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रशासनाकडून बोटीच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील पाच जण बेपत्ताच

सांगलीतील ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना काल (गुरुवार 8 ऑगस्ट) बोट उलटून (Boat Overturn) झालेल्या दुर्घटनेतील पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. नऊ जणांचे मृतदेह काल सापडले होते.

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात उलटली. पाण्याची स्थिती इतकी भीषण होती, की बोट उलटताच अनेक जण वाहून गेले.

सांगलीत हाहाःकार

सांगली शहरातील 65 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. अनेक भागात महापुराचं पाणी शिरुन मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचं म्हटलं जात आहे.

बचावकार्य वेगाने

बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) ची तीन पथकं आणि राज्य आपत्ती निवारण (एसडीआरएफ) ची दोन पथकं पाचारण करण्यात आली आहेत. आतापर्यंत एक लाख 19 हजार 176 पूरग्रस्त आणि 25 हजार 260 जनावरांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे.

एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये चार बोटी आणि 24 जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी दोन बोटी आणि 28 जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर आणि करमाळ्यावरुन प्रत्येकी पाच बोटी मागवण्यात आल्या आहेत.