शाळांची दिवाळीची सुट्टी वाढवली, आता पाच दिवसांऐवजी 14 दिवस सुट्टी

| Updated on: Nov 06, 2020 | 5:44 PM

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे

शाळांची दिवाळीची सुट्टी वाढवली, आता पाच दिवसांऐवजी 14 दिवस सुट्टी
Follow us on

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती अखेर मान्य झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुट्टीत नऊ दिवसांची वाढ केली आहे. उद्यापासूनच (07 नोव्हेंबर 2020) ऑनलाईन शिक्षण बंद होणार आहे. (School College Diwali Vacation increased announces School Education Dept Minister Varsha Gaikwad)

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ पाच दिवसांचीच दिवाळीची सुट्टी होती. मात्र आता ही सुट्टी नऊ दिवसांनी वाढल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गही खुश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याचे सांगताच आनंदाची लहर पसरली, मात्र अवघ्या पाच दिवसांची सुट्टी असल्याने अनेक जण हिरमुसले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. दर वर्षी दिवाळीची सुट्टी 21 दिवसांची असते, परंतु यंदा कोरोनामुळे शाळा उशिरा उघडल्याने दिवाळीच्या सुट्टीला कात्री लागली.

माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. तसेच एकूण कामाचे दिवस 230 दिवस होणे आवश्यक होईल. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान 200 व इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान 220 होणे आवश्यक आहे, असंही परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. (School College Diwali Vacation increased announces School Education Dept. Minister Varsha Gaikwad)

दहावी-बारावीच्या परीक्षा मेपूर्वी अशक्य

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ प्रस्ताव आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. त्याबाबत नियमावली, सूचनाही अद्याप जाहीर झालेला नाही.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी जाहीर; 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत शाळा राहणार बंद!

दहावी-बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार : वर्षा गायकवाड

(School College Diwali Vacation increased announces School Education Dept. Minister Varsha Gaikwad)