रत्नागिरी : तुम्ही जर सुट्टीचं नियोजन गणपतीपुळे येथे करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका गणपतीपुळे देवस्थानला बसला आहे. या पावसाने गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंतच ठिकठिकाणी कोसळली. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे भाविकांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे. आता यात गणपतीपुळे मंदिराचाही समावेश झाला. ठिकठिकाणच्या संरक्षक भिंतीसह तलावाचीही भिंत कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानचं जवळपास 15 ते 20 लाखांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने डागडुजी देखील करणं शक्य नाही.
पाऊस कमी झाल्यानंतर ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे. त्या ठिकाणची डागडुजी करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत पुढचे काही दिवस प्रदक्षिणा मार्ग बंद राहणार आहे. मंदिर प्रशासनाने डागडुजीचे काम सुरु केलं असलं, तरी ते कधी पूर्ण होणार याची स्पष्ट कल्पना देण्यात आलेली नाही. दुरुस्तीच्या कामात पावसाचाही अडथळा येत आहे. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांनी मोठी निराशा होणार आहे.