आता काशी, मथुरेची चर्चा सुरू झालीय, देशाचं सामाजिक ऐक्य कसं टिकणार?; पवारांचा सवाल

| Updated on: Oct 02, 2020 | 8:00 PM

''आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचं दिसतं. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटत आहे,'' असं शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आता काशी, मथुरेची चर्चा सुरू झालीय, देशाचं सामाजिक ऐक्य कसं टिकणार?; पवारांचा सवाल
Follow us on

मुंबई: ”अयोध्येनंतर आता काशी, मथुरेची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे देशाचं सामाजिक ऐक्य कसं टिकणार?, असा सवाल करतानाच आम्हाला देशाच्या सामाजिक ऐक्याची काळजी वाटत आहे,” असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. (sharad pawar  on Kashi, Mathura temples)

शरद पवार यांनी ट्विट करून ही काळजी व्यक्त केली आहे. ”आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचं दिसतं. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटत आहे,” असं पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

”माधव गोडबोले केंद्रीय गृह सचिव होते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आधीच केला होता. नंतर काय होईल याचीही खात्री त्यांना होती व नंतर जे घडलं ते त्यांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत त्यांनी त्यांच्या मनातली अस्वस्थता माध्यमांकडे नमूद केली त्याबद्दल मला आश्चर्य वाटलेलं नाही, असं सांगतानाच बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाच्या निकालाबाबत मी न्यायमूर्तींबद्दल काही बोलणार नाही. पण काल मी माधव गोडबोले यांचे विधान टीव्हीवर ऐकले. ‘सगळ्या प्रकारचे पुरावे याठिकाणी दिल्याच्या नंतरही असा निर्णय होतो, याचं मला आश्चर्य वाटतं,’ हे उद्गार माधव गोडबोले यांचे होते,” असं सूचक विधानही पवार यांनी केलं आहे. (sharad pawar  on Kashi, Mathura temples)

”ज्यावेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार झाला त्यावेळी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री होतो. हा विषय माझा नव्हता. पण मला आठवतंय गोडबोले यांनी तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव, शंकरराव चव्हाण आणि आम्हा सहकाऱ्यांच्या कानावर काही वस्तुस्थिती घातली होती. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी अभिवचन दिलं होतं की, या बाबरी मशिदीच्या वास्तूला धक्का बसणार नाही. पण हे अभिवचन पाळलं जाणार नाही, असं मत तेव्हाचे केंद्रीय गृह सचिव म्हणून माधव गोडबोले यांनी मांडलं होतं. पण नरसिंह राव उत्तर प्रदेशच्या तेव्हाच्या राज्यप्रमुखांच्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे, या मताचे होते. त्यामुळे गोडबोलेंच्या मताचा स्वीकार झाला नाही. दुर्दैवाने त्याची परिणती जे गोडबोलेंना वाटत होतं त्यामध्येच झाली,” असंही पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

मी आणि माझ्या स्टाफने आज लस घेतली, सीरम इन्स्टिट्यूटच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

(sharad pawar  on Kashi, Mathura temples)