काहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; ‘बिग बॉस’च्या वादावर शिवसेना आक्रमक

| Updated on: Oct 28, 2020 | 7:54 PM

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेलाच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. | Arvind Sawant

काहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; बिग बॉसच्या वादावर शिवसेना आक्रमक
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात कोणीही येते आणि काहीही बरळते, हे राज्य म्हणजे तुम्हाला धर्मशाळा वाटते का? महाराष्ट्राविषयी उलटसुलट वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला. कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) याने मराठी भाषेविषयी अवमानकारक उद्गार काढल्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी मराठी भाषेचा अवमान कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. (Arvind Sawant on Jan Kumar Sanu controversial statement in Big boss)

लोकसभेत प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत भाषण करण्याचा हक्क आहे. संविधानाने खासदारांना तसा अधिकारच दिला आहे. मग महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना तिचा अपमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो? दक्षिणेतील राज्यांमध्ये जाऊन पाहा, त्याठिकाण हिंदी भाषेचा जाहीरपणे विरोध होतो. कर्नाटकमध्ये उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकावरही इंग्रजी भाषेत त्यांच्याविषयीची माहिती दिलेली आहे. मग महाराष्ट्रात येऊन काहीही बोलायला, हे राज्य म्हणजे धर्मशाळा वाटली का?, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

भविष्यात मराठी भाषेचा अशाप्रकारे अवमान सहन करून घेतला जाणार नाही. एकमेकांच्या भाषेचा सन्मान ठेवा. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेलाच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असा आपला आग्रह असल्याचेही अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितले.

काय आहे प्रकरण?
‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

संबंधित बातम्या:

‘मनसे’च्या धमकीनंतर ‘बिग बॉस’च्या सेटबाहेरील सुरक्षेत वाढ; फिल्मसिटीत मोठा पोलीस बंदोबस्त

Jaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा

(Arvind Sawant on Jan Kumar Sanu controversial statement in Big boss)