नाणारला समर्थन दिल्याने धमक्या, महिला शिवसैनिकाचा आरोप

| Updated on: Feb 20, 2020 | 3:18 PM

कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पातील समर्थकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला (Nanar refinery project Threaten supporter) आहे.

नाणारला समर्थन दिल्याने धमक्या, महिला शिवसैनिकाचा आरोप
Follow us on

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पातील समर्थकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला (Nanar refinery project Threaten supporter) आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला समर्थन केल्याने जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी जिवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. नाटे पोलीस ठाण्यात शिवलकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्मी शिवलकर या सागवे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना सदस्या आहेत. त्यांनी कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी आणि आयलॉग या दोन्ही प्रकल्पाच्या समर्थन दर्शवले होते. याबाबत त्या रस्त्यावरही उतरल्या होत्या.

“पण या प्रकल्पाचे समर्थन केल्याचा राग मनात धरुन सागवे कात्रादेवी गावातील शीतल सीताराम गुरव, वर्षा रविंद्र गुरव, राजश्री राजेंद्र पुरळकर, परशुराम कृष्णा पुजारी आणि अजय लक्ष्मीकांत राणे यांनी आपल्या विरोधात एका खासगी वृत्त वाहिनीवर भडकावू विधान केले. त्यानंतर शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिली,” असं लक्ष्मी शिवलकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

यानंतर लक्ष्मी शिवलकर यांनी पोलिसांत धाव घेत नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकल्पांना विरोध करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या जीवावर काही मंडळी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींपासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी शिवलकर यांनी केली आहे

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.