अदिती तटकरेंच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आक्रमक, रायगडमध्ये महाविकास आघाडीत कुरबूर

| Updated on: Jun 22, 2020 | 5:18 PM

वादळग्रस्त नागरिकांना मदत करण्यावरुन रायगडमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतच जुंपली असल्याचे दिसत आहे (Shivsena party worker demand Aditi Tatkare resignation).

अदिती तटकरेंच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आक्रमक, रायगडमध्ये महाविकास आघाडीत कुरबूर
Follow us on

रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा या तीन तालुक्यांमुळे प्रचंड नुकसान झालं आहे (Shivsena party worker demand Aditi Tatkare resignation). या भागातील वादळग्रस्त नागरिकांना मदत करण्यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतच चांगली जुंपली असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

“पालकमंत्री अदिती तटकरे शासनाकडून आलेली सर्व मदत नागरिकांना पोहोचवत नसून फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देतात”, असा आरोप अनिल नवगणे यांनी केला. म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालयात अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अदिती तटकरेंवर गंभीर आरोप केले.

हेही वाचा : माजी केंद्रीय मंत्र्यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, पवारांना पत्र लिहित राजीनामा

“अत्यावश्यक वस्तूंचे दोन हजार किट मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून म्हसळा तालुक्यासाठी आले होते. हे किट तालुक्यातील सर्व गरजूंना मिळणं अपेक्षित होतं. मात्र, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनावर दबाव टाकून या सर्व किटचे वाटप फक्त राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये केलं”, असा आरोप नवगणे यांनी केला.

“रायगडमध्ये सरकार आणि सामाजिक संस्थांकडून येणारी अन्नधान्याची मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांचे हस्ते देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फक्त श्रीमंत लोकांना मदत दिली जात आहे”, असा गंभीर आरोप अनिल नवगणे यांनी केला.

हेही वाचा : WhatsApp Alert: 100 हून अधिक मुलींचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक, सुरक्षेसाठी सोप्या टिप्स

“जिल्ह्याचे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांकडे अन्नधान्य द्यावे लागत आहेत. या संकंट काळात पालकमंत्र्यांना फक्त पक्षच दिसत आहे”, अशी टीका अनिल नवगणे यांनी केली.

“आमची त्यांना एवढीच विनंती आहे की, त्यांना पक्ष सांभाळायचा असेल तर त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मंत्री असतो. त्यामुळे आम्हाला पालकमंत्री बदलून द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत. पालमंत्री कोणत्याही पक्षाचा असला तरी तो सक्षम असावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत”, असं अनिल नवगणे यांनी सांगितलं.