भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडेसह प्रमुख नेते गैरहजर, चंद्रकांत पाटील म्हणतात…

| Updated on: Dec 13, 2020 | 10:26 PM

ओबीसी समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिला आहे, असा दावा आज (13 डिसेंबर) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडेसह प्रमुख नेते गैरहजर, चंद्रकांत पाटील म्हणतात...
Follow us on

मुंबई : ओबीसी समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिला आहे, असा दावा आज (13 डिसेंबर) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपच्या ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी हा दावा केलाय. विधान परिषद निवडणुकीत ओबीसी मतदार दुरावला आणि भाजपला वर्षानुवर्षे वर्चस्व असलेल्या पदवी आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत फटका बसला (Special report on OBC Politics BJP and Upcoming Elections).

भाजपच्या ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंचावरची दृश्यं बऱ्याच अर्थाने बरंच काही सांगून जाणारी होती. या ठिकाणी एकाच माळेत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि ओबीसी मोर्च्याचे प्रमुख योगेश टिळेकर यांना बसवण्यात आले होते. यातून टिळेकर यांना पहिल्या फळीतील नेतृत्वात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. यातून ओबीसी समाज भाजपपासून दुरावता कामा नये यासाठी पुरेपुर प्रयत्न होत आहेत. कारण ओबीसी दुरवल्याचा फटका भाजपला अगदी अलीकडे झालेल्या विधान परिषदेच्या पदवी आणि शिक्षक मतदार संघात बसला आहे.

या बैठकीत भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी नेहमीच भाजपसोबत राहिल्याचं सांगितलं. तसेच हा मुद्दा मांडत असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचं नाव आवर्जून घेतलं. विद्यमान आघाडी सरकार मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला, तर ते खपवून घेणार नाही. त्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही भाजपने सरकारला दिला.

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदेंसारखे नेते गैरहजर

आधी एकनाथ खडसे याचा पक्षाला राम राम आणि आता पंकजा मुंडे यांची अघोषित नाराजी यामुळे ओबीसी समाज भाजपपासून दूर जात असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे आजच्या या बैठकीला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे हे भाजपचे ओबीसी नेते हजर नसल्याने पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यावर स्पष्टीकरण देत म्हणाले, “ही भाजपच्या एका प्रकोष्टची बैठक असून त्यात हे नेते असणं अपेक्षित नाही. तसेच हे सर्व भाजपचे मोठे नेते आहेत आणि ते भाजपचं नेतृत्व करत आहेत. विधान परिषद निवडणुकीत पराभवाची कारणे वेगळी आहेत. ओबीसी समाज दुरावणे हे त्या मागचं नेमके कारण नाही.”

महाराष्ट्रत 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका मांडणारे प्रकाश शेंडगे यांनी देखील देवेंद्रं फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा आणि भाजपसोबत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. ओबीसी समाज दुरावल्यास आगामी महापालिका असोत किंवा ग्रामपंचायत निवडणुका या सर्वांचं गणित बिघडेल.

हेही वाचा :

पाच वर्षात ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगा? वडेट्टीवारांचं फडणवीसांना शिवाजी पार्कवर खुल्या चर्चेचं आव्हान

भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ पाहा :

Special report on OBC Politics BJP and Upcoming Elections