पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी कार्यालयात तोडफोड
जिल्ह्याला खरीप पीक विमा अनुदानातून वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करत पीक विमा द्या, अशी घोषणाबाजी केली.
उस्मानाबाद : जिल्ह्याला खरीप पीक विमा अनुदानातून वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले (Swabhimani Shetkari Sanghatana). त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करत पीक विमा द्या, अशी घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात 2019 च्या सुरुवातीला भीषण दुष्काळ होता. त्यामुळे नापिकीची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपाल यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत केली (Crop insurance).
उस्मानाबाद जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर पाऊस आणि पाणीसाठाही कमीच आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, हे मान्य करते. दुसरीकडे, पीक विमा कंपन्या मात्र पीक विमा नाकारतात. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्तेनी कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करत पीक विम्यासाठी आंदोलन केलं.
उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी काळात पीक विम्याचा आणि विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा मुद्दा चांगलाच पेटणार आहे.