कर्जमाफी झाली, अंगठ्याचा गोंधळ कायम, ‘आधार’च्या घोळानं कर्जमाफीची वाट बिकट

| Updated on: Mar 01, 2020 | 4:20 PM

यादीतील काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जुळत नसल्याचने त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया खोळंबली आहे.

कर्जमाफी झाली, अंगठ्याचा गोंधळ कायम, आधारच्या घोळानं कर्जमाफीची वाट बिकट
Follow us on

वर्धा : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या. यापैकी पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळायला देखील सुरुवात झाली. मात्र, पहिल्या यादीपासूनच तांत्रिक अडचणी सुरु झाल्या आहेत. या यादीतील काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जुळत नसल्याचने त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया खोळंबली आहे (Technical Problem of Aadhar in Loan Waiver ). त्यासाठी त्यांचा आधार क्रमांक दुरुस्त करवा लागणार आहे. मात्र, हा सुधारित आधार क्रमांक शासनाच्या सर्व्हरवर अपलोड कोण आणि कधी अपलोड करणार असा प्रश्न निर्माण झालाय. या घोळामुळे काही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून सध्यातरी वंचित झाले आहेत. एवढंच नव्हे, तर जाहीर झालेल्या पहिल्या यादीत चार मृत शेतकाऱ्यांचाही समावेश आहे.

पहिल्या यादीतील 8 शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेच्या केवायसीमध्ये वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे निघाले आहेत. या शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या आधारमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्त आधार क्रमांक कोणी अपलोड करायचा असा प्रशासकीय गोंधळ सुरु आहे. याचा थेट फटका चिंताग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे शासनस्तरावर याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हा निबंधक गौतम वालदे यांनी दिलीय. जिल्ह्यात पहिल्या यादीत या प्रकाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याची संख्या 8 आहे. ही संख्या सध्या कमी दिसत असली तरी राज्याचा विचार केल्यास हा आकडा मोठा होण्याची शक्यता आहे.

जाहीर झालेल्या पहिल्या यादीत जिल्ह्याच्या 2 गावातील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 4 शेतकरी मृत असल्याचं समोर आलंय. लोणी येथील शेतकरी कवडुजी सपाट यांचा 14 ऑक्टोंबर 2018 ला आजाराने मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यावर नाचणगाव बँक ऑफ इंडियाचं 1 लाखांचं कर्ज होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा गणेशने परिवाराचा गाढा उचलत शेती केलीय. मात्र उत्पन्न न झाल्यानं वडिलांवर असलेलं कृषी कर्ज थकीत राहिलं. याचदरम्यान शेतातील कपासी पिकावर बोंड अळीनं हल्ला करत पीक उध्वस्त केलं. सरकारकडून मदतही करण्यात आली. याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत बँकेत पैसे जमा झाले. मात्र बँकेने मिळालेली मदत 15 हजार 998 रुपये कृषी कर्जात वळती केली. अनेक तक्रारी केल्या, मात्र हाती निराशाच लागली.

राज्यात नवीन सरकार आलं आणि 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. यात कवडू सपाट यांचे लाभार्थ्यांच्या यादीत नावही आलं. मात्र योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. यासाठी कवडू सपाट यांचा अंगठा आवश्यक आहे. कवडू सपाट यांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा वारसदाराची नोंद करायला प्रशासनाने सांगितलंय. पण वारसानं नोंद करुनही लाभ अद्याप मिळाला नाही. अशीच काहीशी परिस्थिती लोणी येथील मृत शेतकरी भगवान पिंपळकर यांच्या परिवाराची आहे.

यासह आधारचा घोळही शेतकऱ्याच्या जिव्हारी लागला आहे. लोणी येथील रवींद्र कासार यांच्याकडे 3 एकर सामायिक शेती आहे. 2018 मध्ये रवींद्रने 80 हजारांचं कर्ज काढलं होतं. सततच्या नापाकीनं ते कर्ज भरू शकले नाही. सरकारची कर्जमाफी जाहीर यात यांचं नावही आलं. मात्र, आधारच्या घोळानं यांच्या कर्जमाफीची वाट अडवली आहे. अशीच परिस्थिती पहिल्या यादीचा 8 शेतकऱ्यांची आहे. हा आकडा वर्ध्यात जरी कमी असला, तरी राज्यात मोठा आहे.

पहिल्या यादीचा 166 शेतकऱ्यांपैकी 154 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. यापैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमही वळती करण्यात आली. 8 शेतकरी आधारच्या घोळामुळे सध्या वंचित आहेत, तर 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. यात पहिल्या यादीच्या लोणी गावातील कवडु सपाट आणि भगवान पिपळकार यांचा समावेश आहे, तर येनगाव येथील सुलोचना धारपुरे आणि नत्थु पाटील यांचा समावेश आहे.

मागील सरकारच्या कर्जमाफी योजनेत शेतकरी ऑनलाईनच्या कचाट्यात सापडलेला होता, तर या सरकारनं जाहीर केलेल्या योजनेत शेतकऱ्याला फक्त आधार प्रमाणिकरणाची गरज आहे. मात्र यातही अनेकांच्या आधारमध्ये असलेला घोळ शेतकऱ्यांसाठी मनस्ताप देणार ठरतो आहे.

Technical Problem of Aadhar in Loan Waiver