साहित्य संमेलन : उद्घाटक म्हणून ‘या’ तीन नावांची शिफारस

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण गावगुंडाच्या विरोधानंतर मागे घेण्याचा निर्णय संमेलनाच्या आयोजकांनी घेतला. त्यानंतर अनेक मराठी लेखकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असताना, आता संमेलनाच्या आयोजन समितीने सारवासारव सुरु केली आहे. नयनतारा सहगल यांच्याऐवजी आता मराठी साहित्यसृष्टीतील तीन नावांची […]

साहित्य संमेलन : उद्घाटक म्हणून या तीन नावांची शिफारस
Follow us on

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण गावगुंडाच्या विरोधानंतर मागे घेण्याचा निर्णय संमेलनाच्या आयोजकांनी घेतला. त्यानंतर अनेक मराठी लेखकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असताना, आता संमेलनाच्या आयोजन समितीने सारवासारव सुरु केली आहे. नयनतारा सहगल यांच्याऐवजी आता मराठी साहित्यसृष्टीतील तीन नावांची शिफारस साहित्य महामंडळाला शिफारस करण्यात आली आहे.

तीन नावांचे पर्याय

ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ पत्रकार-लेखक सुरेश द्वादशीर यांच्या नावांची शिफारस अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून शिफारस करण्यात आली आहे. अर्थात, अंतिम निर्णय साहित्य महामंडळ घेणार आहे. आता या तीनपैकी कुणाची निवड उद्घाटक म्हणून होते आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शोधाशोध सुरु

प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांच निमंत्रण रद्द केल्याप्रकरणाचा वाद आता दिवसेंदिवस साहित्य महामंडळाच्या अंगाशी येताना दिसतो आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनाला येऊ नये, हे सांगितल्यानंतर आता आयोजक समितीनं नवीन उदघाटकांसाठी जोरदार शोधाशोध सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. सहगल यांना पर्याय म्हणून कवी विठ्ठल वाघ, जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि जेष्ठ पत्रकार-लेखक सुरेश द्वादशीवार यांना 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्धाटनासाठी यावं, असं समितीकडून सूचवण्यात आलं आहे.

तीन पर्यायांपैकी दोघांचा आधीच नकार

मला या साहित्य संमेलनाला बोलावल तरी मी येणार नाही, अशी भूमिका कवी विठ्ठल वाघ यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे, तर उद्घाटनाबद्दल आपल्याला कोणताही निरोप पोहोचला नसून, याबद्दल उद्याच्या अग्रलेखात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सुरेश द्वादशीवार यांनी सांगितलं. द्वादशीर सुद्धा उद्घाटनाला जातील, याची शक्यता कमी दिसत आहे. अशाच नाटककार महेश एलकुंचवार यांच्या भूमीकेकडे सर्वांचं लक्ष आहे.

वाद काय आहे?

भारतातील प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल या यवतमाळ येथे आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक होत्या. मात्र, ऐनवेळी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षांनी परस्पर सहगल यांना येण्यास नकार कळवला. नयनतारा यांच्यासारख्या प्रख्यात लेखिकेला आधी निमंत्रण दिलं, नंतर नकार कळवला, यामुळे साहित्यविश्वात एकच संतापाची लाट पसरली आहे. कुठल्यातरी गावगुंडांच्या सांगण्यावरुन प्रख्यात लेखिकेचा अपमान केला जातो, याबद्दल राग व्यक्त करण्यात येत आहे.

त्यातच, आता विविध व्याख्यानं, मुलाखती, कवीकट्टा इत्यादी कार्यक्रमांमधूनही सहभागी मान्यवरांनी साहित्य महामंडळाचा निषेध म्हणून माघार घेतली आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांनी मराठी साहित्य महामंडळावर सडकून टीका केली आहे. आसाराम लोमटे, बालाजी सुतार, नामदेव कोळी, आशुतोष जावडेकर, मंगेश काळे इत्यादी लेखक, साहित्यिक, कवी, व्याख्यात्यांनी आयोजकांचा निषेध नोंदवून सहभागी होण्यास नकार कळवला आणि सहगल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाचे पाय आणखीच खोलात रुतले आहेत. आता यावर उपाय काय, असा प्रश्न आ वासून साहित्य महामंडळासमोर आहे.

दरम्यान, नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याबाबत अद्याप 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा अरुणा ढेरे यांची सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, तत्पूर्वी आयोजकांनी उद्घटाक म्हणून नव्या तीन नावांची चर्चा सुरु केली आहे.