हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

| Updated on: Oct 19, 2020 | 12:13 PM

केंद्र सरकारने राज्याची देणी थकवली आहेत. ते पैसे मिळाले असते तर केंद्र सरकारकडे हात पसरावे लागले नसते. | CM Uddhav Thackeray

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Follow us on

सोलापूर: हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या मी नेमकी किती मदत करायची याची माहिती गोळा करत आहे. ही माहिती उपलब्ध झाली की शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकऱ्यांना नाराज करणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. (CM Uddhav Thackeray in Solapur)

उद्धव ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना आश्वस्त केले. हे सरकार शेतकऱ्यांचं आणि जनतेचं आहे. त्यामुळे सरकार तुम्हाला नाराज करणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या किती मदत करायची ही माहिती आम्ही गोळा करत आहोत. ही माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही त्यावर अभ्यास करत बसणार नाही. तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


तसेच गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मला यावरुन कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, केंद्र सरकारने राज्याची देणी थकवली आहेत. ते पैसे मिळाले असते तर केंद्र सरकारकडे हात पसरावे लागले नसते. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरुन राजकारण करु नये. कधीकाळी आपणही सत्तेत होतो, याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

याशिवाय, राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूरातील आजच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 11 कुटुंबीयांना नुकसानभरपाईच्या धनादेशांचे वाटप केले.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही; सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक

(CM Uddhav Thackeray in Solapur)