बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक; व्यापारी संघटनांचा पाठिंब्यास नकार

| Updated on: Jan 29, 2020 | 10:38 AM

बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदची हाक देण्यात आल्यानंतर राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली आहे.

बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक; व्यापारी संघटनांचा पाठिंब्यास नकार
26 Feb Bharat Bandh
Follow us on

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने आज (29 जानेवारी) भारत बंदची हाक दिली आहे (Bahujan Kranti Morcha calls Bharat Band). या भारत बंदमध्ये व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं आहे. मात्र, या बंदला महाराष्ट्रातील काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदची हाक देण्यात आल्यानंतर सातारा शहर व्यापारी संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात बंद न पाळण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आलं आहे (Bahujan Kranti Morcha calls Bharat Band).

“आंदोलन हे सरकारच्या निर्णयाविरोधात असतं. आंदोलनामध्ये सामान्य जनता आणि व्यावसायिक उगाच भरडली जात आहेत. याअगोदरही 24 जानेवारीला शहरात बंद पाळण्यात आला होता. या बंदचा आमचा दुरान्वये संबंध नसतानाही अतोनात नुकसान होत आहे”, अशी भूमिका साताऱ्याच्या व्यापारी संघटनेने पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. “पोलीस आणि प्रशासनाने व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी संरक्षण द्यावे”, अशी मागणी सातारा शहर व्यापारी संघटनांनी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान, सातारा शहर व्यापारी संघटनेप्रमाणे परळी आणि उदगीरच्या व्यापारी संघटनांनीदेखील भारत बंदला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. 29 जानेवारी रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत, असे निवेदन परळी शहर व्यापरी संघटनेने प्रशासनाला दिलं आहे. “बंदमुळे बाजारपेठेला मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त वेळा व्यापाऱ्यांना आपली दुकानं बंद ठेवावी लागली आहेत”, असं निवेदनात म्हटले आहे.

उदगीर व्यापारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. “आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. कोणी आमच्या व्यापारी प्रतिष्ठानवर दगडफेक केली आणि नुकसान झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहिल”, असे निवेदनात म्हटलं आहे.

राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

दरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संपू्र्ण महाराष्ट्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.