पालघर : सध्या गणेशोत्सवाचा उत्साह असून घरगुती गणपती देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून समाज प्रबोधन (Social Awareness) करत आहे. तारापूर येथील राऊत कुटुंबीय मागील 92 वर्षांपासून आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश देत आहेत. यावर्षी राऊत कुटुंबीयांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देत जंगलतोडीमुळे (Deforestation) जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे येऊन नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचं चलचित्र साकारलं आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील राऊत कुटुंबीय मागील 92 वर्षापासून घरगुती गणेशोत्सव साजरा करतात. घरगुती गणेशोत्सव साजरा करणारी राऊत यांची ही तिसरी पिढी मात्र चला चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देते. यावर्षी राऊत कुटुंबीयांनी जंगलतोडीमुळे जंगलातील प्राणी मानवी वसाहती येऊन नागरिकांवर करत असलेल्या हल्ल्याचं चलचित्र देखाव्यात साकारला आहे. हे चलचित्र साकारण्यासाठी कुटुंबीयांनी मागील दोन महिन्यांपासून मेहनत घेतली आहे.
राऊत कुटुंबीयांनी आतापर्यंत स्त्री भृण हत्या, सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम, हुंडाबळी असे विविध सामाजिक संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारले आहेत. यावर्षीही जंगलतोड राखून जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असा संदेश राऊत कुटुंबियांनी दिला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राऊत कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली.
गणेशोत्सवातील देखावे आकर्षक व्हावे यासाठी अनेक गणेश मंडळ रात्रं-दिवस मेहनत करत असतात. मात्र दुसऱ्या बाजूला कमी खर्चात कमी वेळेत सामाजिक बांधिलकी म्हणून राऊत कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून समाजाला बोध घेता येईल असे सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखाव्यातून सादर करत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.