Tukaram Mundhe Exclusive | मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे

| Updated on: Jun 22, 2020 | 11:16 AM

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतून निघून जाण्याची कारणं सांगितली आहेत (Tukaram Mundhe on Nagpur Municipal Corporation dispute).

Tukaram Mundhe Exclusive | मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे
Follow us on

नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी वाद टोकाला गेला आहे. त्याचंच रुपांतर म्हणून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे अचानकपणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतून निघून गेले. यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यांनी सभात्याग का केला असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे (Tukaram Mundhe on Nagpur Municipal Corporation dispute). याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सभात्यागाचं कारण सांगत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणणाऱ्यांना काय उत्तर देऊ, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी महापौर आणि नगरसेवकांवर अधिकाऱ्याचं खच्चीकरण केल्याचा, अधिकाऱ्याला बोलू न दिल्याचा आणि व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचाही गंभीर आरोप केला आहे.

तुकाराम मुंढे म्हणाले, “महासभा घ्यावी की नाही यावर मी एपिडिमिक अॅक्टनुसार माझं मत महापौरांना सांगितलं होतं. शासनाकडेही मी याबाबत मार्गदर्शन मागितलं होतं. त्यांनी याबाबत अटी शर्तींचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यास सांगून सूचना केल्या. त्यानंतर ही सभा झाली. सभा झाली तेव्हा मी स्वतः हजर होतो. मात्र, सभा सुरु होताच मी कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यायला तयार असताना नगरसेवक आणि इतर पदाधिकारी मी बोलत असतानाच उभे राहून अडथळा करत होते. कोणताही प्रश्न विचारायचा आणि उत्तर देण्यास सुरुवात केली की अर्ध्यावर थांबवायचं. अधिकाऱ्यांना बोलून द्यायचं नाही. त्यानंतर अर्धवट वाक्यांचा विपर्यास करुन त्याला चुकीच्या पद्धतीने सादर करायचं. सदस्यांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढण्याचा अधिकार आहे, मात्र, तो उत्तर पूर्ण देऊन झाल्यावर आहे. मात्र, उत्तर देत असतानाच अधिकाऱ्यावर मोठ्या आवाजात ओरडणं, अधिकाऱ्याच्या दिशेने अंगुलीनिर्देश करुन त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणं हे निंदनीय आहे.”

“हे होत असल्याने अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होतं. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मी हे महापौरांच्या लक्षात आणून दिलं. तसेच हे परत झालं तर सभागृहात थांबणार नाही हे सांगितलं. यानंतरही हा प्रकार घडला. एका नगरसेवकाने तुम्ही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहात. इंग्रज तुमच्यापेक्षा बरे होते, असं विधान सातत्याने करत होते. असं होत असतानाही महापौरांनी संबंधित नगरसेवकांना कोणतीही सूचना दिली नाही. त्यांना थांबण्यास सांगितलं नाही. अशाप्रकारची शेरेबाजी करु नका असंही सांगितलं नाही. अशाप्रकारे व्यक्तिगत शेरेबाजी करण्याचा अधिकार ना अधिकाऱ्यांना आहे, ना पदाधिकाऱ्यांना. सभागृहाची शिस्त कायम ठेवणं महापौरांची जबाबदारी असताना त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे यानंतर सदस्यांनी तुम्ही तुकाराम महाराजांवर कलंक आहात हा शब्दप्रयोग केला. त्यावेळी मी उठलो आणि महापौरांना हे व्यक्तिगत प्रतिमाहनन असल्याचं सांगितलं. तसेच सभात्याग करत असल्याचं स्पष्ट केलं,” असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

“महौपारांचं दुटप्पीपणाचं धोरण चुकीचं”

तुकाराम मुंढे म्हणाले, “महापौरांनी मला पत्र पाठवत सभात्याग करणं हा सभागृहाच्या इतिहासातील कलंक असल्याचं सांगितलं. महापौरांनी मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक आहे असं म्हणणाऱ्यांना बोलण्याऐवजी मलाच कलंक असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ हे परस्पर संमतीने सुरु आहे. महापौरांचं काम समन्यायाने कुणावर अन्याय न होता सभागृह चालवणं आहे. पण त्यांनी त्याऐवजी दुजाभाव केला आणि बाहेर अर्धवट माहिती दिली. एकिकडे महापौरांनी सभागृहात अधिकार असताना चारित्र्यहनन होऊ दिलं आणि वर मलाच कलंक असल्याचं म्हटलं. हे महौपारांचं दुटप्पीपणाचं धोरण चुकीचं आहे. म्हणूनच मी सभागृहाबाहेर निघून आलो.”

“जसं महापौर ही व्यक्ती नसून संस्था आहे, तसंच आयुक्त ही देखील व्यक्ती नसून संस्था आहे. जर सभागृहात आयुक्तांनाच बोलू दिलं जात नसेल तर इतर अधिकाऱ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार करता येईल. महापौरांनी सभागृहात चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घ्यायचा नाही आणि नंतर विनंतीच्या स्वरुपात बोलायचं याचा अर्थ समजून घेता येईल,” असंही ते म्हणाले.

“व्यवस्थात्मक प्रश्न त्याच मार्गाने साडवावे लागतील, एकटा तुकाराम मुंढे काहीही करु शकत नाही”

तुकाराम मुंढे म्हणाले, “मागील तीन महिन्यापासून आपण कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहोत. आम्ही त्या कामात व्यग्र आहोत. त्यावरच आमचं लक्ष केंद्रित आहे. असं असताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरही कामं केलं. त्यामुळे यंत्रणा तणावत आहे. असं असताना यंत्रणांना समजून घेणं आवश्यक आहे. वर्षानुवर्षांचे प्रश्न 2-3 महिन्यात संपणार नाही. काही व्यवस्थात्मक प्रश्न असतील तर त्याला त्याच मार्गाने साडवावे लागतील. एकटा तुकाराम मुंढे काहीही करु शकत नाही. उन्हाळ्यात आम्ही पाण्याची कमतरता येऊ दिली नाही. अनेक कामं केली तरी यंत्रणांना दोष देण्यात येत आहे.”

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर, आयुक्तांनी समजूतदारपणे घ्यायला हवं होतं, महापौरांची प्रतिक्रिया

तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीनंतर नागपुरातील विकास कामांना ब्रेक, नगरसेवक आक्रमक

.. तर तुकाराम मुंढेंविरोधातील काँग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ : भाजप

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe on Nagpur Municipal Corporation dispute