शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Nov 08, 2020 | 4:00 PM

उद्धव ठाकरे यांनी माजी सैनिकांबरोबरच 'फोर्स वन'मधील जवानांसाठी महत्त्वाची घोषणा केली. | CM Uddhav Thackeray

शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई: राज्यातील माजी सैनिक आणि युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींसाठी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेतंर्गत हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. (Maharshtra govt big decision for Veteran soldiers and martyr soldier wife )

उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमांतून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी सैनिकांबरोबरच ‘फोर्स वन’मधील जवानांसाठी महत्त्वाची घोषणा केली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘फोर्स वन’ची उभारणी करण्यात आली होती. या फोर्स वनला आपण आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवत आहोत. तसेच ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजुबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

‘महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी केली, तरीही आपल्या राज्यात नवे उद्योग आले’
कोरोनाच्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी करण्याचे कारस्थान केले. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली, असा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. या इतक्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी 17 हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणि उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

संबंधित बातम्या:

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे विविध आजारांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर!, मुख्यमंत्र्यांकडून काळजी घेण्याचं आवाहन

(Maharshtra govt big decision for Veteran soldiers and martyr soldier wife )