या नेत्याला पकडण्यासाठी सीबीआयने जेव्हा आर्मीला पाचारण केलं होतं..

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद नवा नाही. पण केंद्रातल्या संस्था आणि राज्यातल्या सरकारी संस्था यांच्यात वाद उद्भवतो, तेव्हा राजकीय वादालाही आपोआप तोंड फुटतं. अशीच परिस्थिती सध्या पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री […]

या नेत्याला पकडण्यासाठी सीबीआयने जेव्हा आर्मीला पाचारण केलं होतं..
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद नवा नाही. पण केंद्रातल्या संस्था आणि राज्यातल्या सरकारी संस्था यांच्यात वाद उद्भवतो, तेव्हा राजकीय वादालाही आपोआप तोंड फुटतं. अशीच परिस्थिती सध्या पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात धरणं सुरु केलंय. अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती कोलकात्यात उद्भवली.

कायद्यानुसार, सुप्रीम कोर्टाचा आदेश, केंद्र सरकारचा आदेश किंवा राज्य सरकारच्या विनंतीनंतरच सीबीआयकडे चौकशी दिली जाते. सध्या शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे दिलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या एसआयटीचे प्रमुख राजीव कुमार होते. त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच सीबीआयला राजीव कुमार यांची चौकशी करायची होती.

आतापर्यंत कधी कधी सीबीआयला आडकाठी?

सीबीआय आणि राज्य सरकार यापूर्वी 1997 मध्ये आमनेसामने आलं होतं. सीबीआयचे तत्कालीन अधिकारी उपेंद्र नाथ बिसवास आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक करण्यासाठी पाटणाला गेले. लालू प्रसाद यादव बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन केवळ पाच दिवस झाले होते. त्यांच्या पत्नीकडे त्यांनी बिहारची धुरा दिली होती. पण राज्य सरकारने बिसवास यांना कोणतंही सहकार्य केलं नाही. विशेष म्हणजे बिहारचे तत्कालीन मुख्य सचिव बी. पी. वर्मा यांच्याकडे बिसवास यांनी मदतीची मागणी केली होती. पण वर्मा सध्या उपलब्ध नसल्याचं उत्तर बिसवास यांना मिळालं होतं.

परिस्थिती एवढी चिघळली की बिसवास यांनी लालू यांना अटक करण्यासाठी आर्मीला बोलवावं, अशी मागणी केली. पण भारतीय सैन्याकडून ही मागणी फेटाळण्यात आली. यानंतर बिसवास यांच्यावर त्यांच्याच विभागातून आणि सत्ताधाऱ्यांकडून मोठी टीका झाली होती. लालू प्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.

कोण आहेत यू. एन. बिसवास?

फायरब्रँड अधिकारी अशी ओळख असलेले बिसवास यांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात ते 2011 ते 2016 या काळात मंत्रीही होते. बिसवास हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांनी अनेक घोटाळ्यांचा तपास केला. सीबीआयचे अतिरिक्त संचालक म्हणून ते निवृत्त झाले होते.

22 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण तेव्हा संसदेतही गाजलं होतं. लालू तेव्हा सत्तेच्या सर्वोच्च स्थानी होते. तरीही त्यांच्याच गृहराज्यात जाऊन त्यांना अटक करण्याची हिंमत बिसवास यांनी केली होती. देशभरात ते हिरो बनले. आता बिसवास यांच्या नेत्या ममता बॅनर्जी सध्या धरण्यावर बसल्या आहेत. त्यामुळे बिसवास यांचा सल्ला त्यांच्यासाठी नक्कीच कामी येईल. शिवाय लालू यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी ममतांना पाठिंबा दिलाय.

Follow Us