वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

पाकिस्तानच्या हवाई दलाशी (Pakistan Air Force) दोन हात करणारे विंगकमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांनी सोमवारी (2 सप्टेंबर) पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी त्यांच्यासोबत हवाईदल प्रमुख बी. एस. धनुआ (Air Chief B S Dhanoa) देखील होते. त्यांनी मिग-21 (Mig-21) मधून पठाणकोट हवाईतळावरून (Pathankot Air Force Station) उड्डाण केलं. ते 6 महिन्यांनी पुन्हा सैन्यात दाखल झाले आहेत.

वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी
| Updated on: Sep 02, 2019 | 2:38 PM

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हवाई दलाशी (Pakistan Air Force) दोन हात करणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांनी सोमवारी (2 सप्टेंबर) पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी त्यांच्यासोबत हवाईदल प्रमुख बी. एस. धनुआ (Air Chief B S Dhanoa) देखील होते. त्यांनी मिग-21 (Mig-21) मधून पठाणकोट हवाईतळावरून (Pathankot Air Force Station) उड्डाण केलं. ते 6 महिन्यांनी पुन्हा सैन्यात दाखल झाले आहेत.

अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं अद्ययावत अमेरिकन युद्धविमान एफ-16 (F 16) पाडलं होतं. त्यानंतर त्यांचं विमानही कोसळलं आणि पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना अटक केली. मात्र, अशा स्थितीतही त्यांनी भारतीय सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती पाकिस्तानला देण्यास नकार दिला होता. त्या काळात त्यांच्या जखमी स्थितीतील फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. देशभरातून त्यांच्या हिमतीचं आणि धाडसाचं कौतुक झालं.


हवाईदल प्रमुख बी. एस. धनुआ यांनी अभिनंदन यांच्यासोबत मिग-21 विमानाचे सारथ्य केलं. यातून त्यांनी एकप्रकारे सैन्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं मत संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं. तसेच यामुळे शत्रुराष्ट्राला ठोस संदेश गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

विंग कमांडर अभिनंदन यांना ‘वीर चक्र’

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना पाकिस्तानविरोधात निकराचा लढा दिल्याबद्दल ‘वीर चक्र’ (Vir Chakra) पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) पाकिस्तानच्या बालाकोट (Balakot) मधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक (Balakot Airstrike) केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. यासाठी हे पदक देण्यात आलं.

‘वीर चक्र’ हे पदक युद्धावेळी वीरता दाखवणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांना प्रदान केलं जातं. असामान्य साहस किंवा बलिदान देणाऱ्या जवानांना हे मानचिन्ह देण्याची परंपरा आहे. ‘परम वीर चक्र’, ‘महा वीर चक्र’ यानंतर ‘वीर चक्र’ हे तिसऱ्या क्रमांकाचं शौर्य पदक आहे.

कारगिल युद्धानंतर (Kargil War 1999) 2000 मध्ये अखेरचं वीर चक्र देण्यात आलं होतं. एकविसाव्या शतकात कोणत्याही जवानाचा ‘वीर चक्र’ने गौरव झालेला नाही.