पनवेलवरुन चालायला सुरुवात, मिळेल ते खायचं, नदीकाठी आंघोळ, अंधार पडला की वस्ती, 800 किमी चालून तरुण चंद्रपुरात

| Updated on: Apr 17, 2020 | 10:08 PM

पनवेलवरुन 2 एप्रिलला चालत निघालेला हा पठ्ठ्या 16 एप्रिलला चंद्रपुरात (Panvel to Chandrapur walking journey) पोहोचला.

पनवेलवरुन चालायला सुरुवात, मिळेल ते खायचं, नदीकाठी आंघोळ, अंधार पडला की वस्ती, 800 किमी चालून तरुण चंद्रपुरात
Follow us on

चंद्रपूर : कोरोनाची भीती आणि गावाची ओढ, खिशात पैसे नाहीत, अशी परिस्थिती असताना चंद्रपूरच्या एका बहाद्दराने (Panvel to Chandrapur walking journey) थोडा थोडका नव्हे तर तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास चालत केला. पनवेलवरुन 2 एप्रिलला चालत निघालेला हा पठ्ठ्या 16 एप्रिलला चंद्रपुरात (Panvel to Chandrapur walking journey) पोहोचला. अजय सातोकर असं या तरुणाचं नाव आहे. रस्त्यात जे मिळेल ते खात, अंधार होईल तिथे वस्ती आणि नदीच्या काठी आंघोळ असं करत करत, त्याने पनवेल ते चंद्रपूर हे अंतर 14-15 दिवसात पार केलं.

चंद्रपूर शहरातील अजय सातोकर नामक युवकाची कथा लॉकडाऊनचे भय सांगणारी आहे. देशात आधी जनता कर्फ्यू मग लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आधी 21 दिवसांसाठी असलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला.

लॉकडाऊनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात मजूरवर्ग जिथल्या तिथे अडकून पडला. देशाच्या विविध भागातील कामगार आणि मजूरवर्ग रोजगार बुडण्याच्या भीतीने आणि त्यामुळे गावाला जाण्याच्या ओढीने चिंतेत होता.

चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागात राहणारा अजय सातोकर हा युवक रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील खासगी युनिव्हर्सिटीत संगणकचालक म्हणून नोकरीत होता. लॉकडाऊनच्या काळात पगार संपला आणि खिशात 300 रुपये उरल्याने, इथे थांबून राहणे अवघड होतं. त्यामुळे त्याने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. (पुढे वाचा)

अजय सातोकरने दोन एप्रिलला पहाटे पाच वाजता पनवेलमधून चालायला सुरुवात केली. चालत चालत तो पुण्यात पोहोचला. रात्री ११ च्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला दुकानाच्या चाळीत मुक्काम केला.

जेवण वाटप सुरु असल्याने थांबला
मग तीन एप्रिलला पुणे ते अहमदनगर असा प्रवास केला. त्यादरम्यान 40 किमीपर्यंत एका गाडीचालकाने लिफ्ट दिली. मग पुन्हा चालत चालत प्रवास केला. मध्येच एका ठिकाणी जेवण वाटप सुरु असल्याने तिथे थांबला आणि रात्री नगरशहरा बाहेरील हनुमान मंदिरात मुक्काम केला.

एका बिस्किट पुड्यावर चार एप्रिलचा प्रवास
नगरमधून तो भीमा कोरेगावला पोहोचला. एका बिस्किट पुड्यावर तो दिवसभर चालला. त्यानंतर एका हार्डवेअर दुकानाच्या बाजूला एका घरातील कुटुंबाने त्याला भाकर आणि चटणी दिली. ती रात्री हार्डवेअर दुकानाबाहेर झोपून काढली.

भीमा कोरेगाव ते औरंगाबाद
मग पुढच्या दिवशी तो चालत औरंगाबादेत पोहोचला. यादरम्यान त्याला एका ट्रकचालकाने 30 किमीपर्यंत लिफ्ट दिली. तिथे एका ठिकाणी जेवण वाटप सुरु होतं. तिथे तो थांबला. नदीवर आंघोळ केली. औरंगाबादेतील शेंद्रा इथं तो राहिला. दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय तपासणी केल्याने तो तिथेच राहिला.

यानंतर मग औरंगाबाद ते जालना बिस्किट पुडा खाऊन प्रवास, मग जालन्यापासून पुढे मेहकर, मालेगाव, वाशीम, पुसद, दिग्रस, उमरी, वणी असं करत करत पुढे चंद्रपुरातील घुग्घूस इथं पोहोचला, तोपर्यंत 16 एप्रिलचा दिवस उजाडला होता.

घुग्घूस इथं दुपारी पावणे बाराच्या सुमारास त्याला पोलिसांनी थांबवले. त्याची चौकशी करुन, पोलिसांनी त्याला गाडीतून थेट सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. वैद्यकीय चाचणीनंतर त्याला पोलीस स्टेशनला आणलं.

चंद्रपूर शहराच्या आधी 25 किलोमीटर असलेल्या औद्योगिक शहर घुग्गुस येथे तो 16 एप्रिल रोजी पोहोचला. यातील सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास त्याला रुग्णवाहिका अथवा एखाद्या दुचाकीवर बसून करता आला. मात्र 800 किलोमीटरचा त्याचा प्रवास पायीच झाला. (पुढे वाचा)

गावकुसाबाहेर ढाब्यावर झोपणे, मिळेल ते खाणे असा त्याचा प्रवास होता. मध्ये आलेल्या नदीत अंघोळ करून अंधार होण्याच्या आत एखाद्या शहरात तो मुक्काम करायचा. गावाकडची ओढ आणि रिकामा खिसा यामुळे येईल त्या अडचणीवर मात करुन तो चालत राहिला.

जिल्हाबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नाक्यावर पोलिसांनी त्याला अडवले. तातडीने त्याला रुग्णालयात तपासणी करून पोलिस ठाण्यात त्याची माहिती नोंदवून घेण्यात आली. सध्या घुग्गुस शहरातच त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र अजयने पनवेल ते चंद्रपूर हा तब्बल 800 किमीचा थरारक प्रवास राज्यभर चर्चेत आहे.