
सध्याच्या धावपळीच्या जगात योग्य शिक्षण आणि संस्कार हीच मुलांना दिली जाणारी खरी देणगी आहे. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांची ही जबाबदारी बनते की, ते आपल्या मुलाला केवळ अभ्यासातच नव्हे तर जीवनाच्या मुल्यांमध्येही योग्य मार्गदर्शन देतात का, याकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. विशेषतः मुलं जेव्हा लहान असतात, तेव्हा त्यांचं मन कोर्या पाटीसारखं असतं जे आपण जे शिकवतो, तेच आयुष्यभर त्यांच्यात टिकून राहतं. म्हणूनच मुलं 10 वर्षांची होईपर्यंत काही मूलभूत गोष्टी शिकवणं फार गरजेचं आहे, ज्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतील आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवतील.
मुलांना लहानपणापासूनच हे शिकवायला हवं की कोणतीही परिस्थिती असली, तरी सत्य बोलणं हेच योग्य. ते जर एखादी चूक करतील आणि कबूल करतील, तर त्यांना रागावण्यापेक्षा समजून सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण खोटं बोलणं हे नात्यांमध्ये फट आणू शकतं, तर प्रामाणिकपणा विश्वासाचं बीज रोवतो.
मुलं जेवढी लवकर स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्यास शिकतील, तेवढं त्यांचं आत्मविश्वास अधिक वाढतं. उदाहरणार्थ, आपला शाळेचा बॅग पॅक करणं, स्वतःचं बिछानं ठीक करणं, होमवर्क पूर्ण करणं अशा गोष्टी त्यांच्यात स्वावलंबन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करतात.
कोणी मोठा-लहान, गरीब-श्रीमंत असो प्रत्येकजण सन्मानास पात्र आहे, हे मूल्य मुलांच्या मनात रुजवणं खूप गरजेचं आहे. विनम्रता आणि आदर यांची शिकवण त्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनवते आणि मानवी संबंध मजबूत करते.
आजच्या काळात मुलांनी आपल्या सुरक्षेसाठी आणि आत्मभानासाठी ‘नाही’ म्हणणं शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणी अज्ञात व्यक्ती चुकीचं काही सुचवत असेल किंवा त्यांना अस्वस्थ वाटत असेल, तर त्यावर स्पष्ट नकार देण्याचं बळ त्यांच्यात असावं.
वेळेचं व्यवस्थापन लहान वयातच शिकवण्याची सवय त्यांना शिस्तीच्या मार्गावर नेते. उठण्याची, शाळेत जाण्याची, अभ्यासाची आणि खेळण्याची वेळ ठरवली की ते वेळेचं महत्त्व समजून घेतात आणि जीवनात पुढे जाऊन यशस्वी होतात.