एअर इंडिया एक्सप्रेसच्या विदेशात प्रवास करण्याचा विचार करताय ? फ्लाईट आधी ‘हे’ नक्की वाचा

एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांच्या सोयीसाठी एका महत्त्वाच्या नियमात बदल केलाय, ज्यामुळे तुम्हाला आता जास्त सामान घेऊन जाता येणार आहे! एअरपोर्टवर ऐनवेळी गोंधळ किंवा जास्तीचे पैसे भरणं टाळायचं असेल, तर हा बदल नक्की जाणून घ्या!

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विदेशात प्रवास करण्याचा विचार करताय ? फ्लाईट आधी ‘हे’ नक्की वाचा
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 3:33 PM

जर तुम्ही एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई, शारजाह, अबू धाबी किंवा सिंगापूरसारख्या ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील बॅगेज धोरणात मोठा बदल करत प्रवाशांना अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जुन्या नियमांची माहिती असलेल्या प्रवाशांसाठी हे अपडेट जाणून घेणं अत्यावश्यक आहे, अन्यथा ऐनवेळी एअरपोर्टवर अडचणीत येण्याची शक्यता असते.

या नव्या निर्णयानुसार, भारतातून मध्य पूर्व (Middle East) देशांमध्ये किंवा सिंगापूरसाठी एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ३० किलोपर्यंतचे चेक-इन बॅगेज घेऊन जाण्याची मुभा मिळणार आहे. याआधी ही मर्यादा २० किलो होती. म्हणजेच, आता प्रवाशांना पॅकिंग करताना १० किलो अधिक सामान नेता येणार आहे. विशेषतः जे प्रवासी खरेदीसाठी किंवा नातेवाईकांकडे भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल.

केबिन बॅगेजसंदर्भात नियमांत फारसा बदल झालेला नाही. प्रवाशांना यापुढेही ७ किलो वजनाचे केबिन बॅगेज सोबत नेण्याची मुभा राहणार आहे. मात्र आता हे ७ किलो वजन दोन बॅगांमध्ये विभागून नेता येईल – उदाहरणार्थ, एक लॅपटॉप बॅग आणि एक छोटी हँडबॅग. हे प्रवाशांना अधिक सोयीचे ठरेल, विशेषतः ज्या लोकांना कामाच्या किंवा वैयक्तिक वस्तू वेगळ्या बॅगांमध्ये ठेवायच्या असतात.

लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी एअर इंडिया एक्सप्रेसने आणखी एक दिलासा दिला आहे. अशा कुटुंबांना चेक-इन बॅगेजमध्ये ३० किलो व्यतिरिक्त अतिरिक्त १० किलो सामान नेतायची मुभा देण्यात आली आहे. म्हणजेच, एकूण ४० किलो चेक-इन बॅगेज आणि ७ किलो केबिन बॅग घेऊन ते प्रवास करू शकतील. ही सुविधा बालकांच्या आवश्यक वस्तूंसाठी उपयुक्त ठरेल.

महत्त्वाचं म्हणजे, ही वाढलेली बॅगेज मर्यादा फक्त ‘भारत ते मध्य पूर्व’ आणि ‘भारत ते सिंगापूर’ या मार्गांवर लागू आहे. जर प्रवास भारतातल्या इतर शहरांदरम्यानचा असेल किंवा इतर आंतरराष्ट्रीय मार्गांवरचा असेल, तर जुनाच २० किलो चा बॅगेज नियम लागू असेल. त्यामुळे प्रवासापूर्वी विमान कंपनीचे नियम तपासून बुकिंग करणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही गैरसोयीपासून बचाव करता येईल.