कल्याणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट; शिंदे-फडणवीस सराकारने काढला GR

ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी वाकळण बामाली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशिव व गोठेघर या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करावा अशी स्थानिकांची मागणी होती.

कल्याणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट; शिंदे-फडणवीस सराकारने काढला GR
| Updated on: Sep 13, 2022 | 12:34 AM

मुंबई : ठाणे जिल्हयातील कल्याण ग्रामीण महानगरपालिकेलगतच्या 14 गावांना (14 Villages) नवी मुंबई महानगरपालिकेत( Navi Mumbai Municipal Corporation) समाविष्ट करण्याच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सराकारने मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने (Urban Development Department)या संदर्भातील शासन आदेश (GR) जारी केला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी वाकळण बामाली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशिव व गोठेघर या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करावा अशी स्थानिकांची मागणी होती.

यासाठी स्थानिक भूमीपूत्र व रहिवाशांच्या मागणीनुसार विविध माध्यमातून सतत पाठपुरावा सुरु होता. या संदर्भात राजू पाटील यांनी 24 मार्च 2022 रोजी सभागृहात लक्षवेधी मांडली होती.

या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गावांचा तातडीने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात येईल व महानगरपालिकेकडून सर्व सोयी-सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाला पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. राजू पाटील यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित होता.

यानंतर 20 ऑगस्ट रोजी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजी पाटील यांनी पत्रव्यवहार केला होता. माहिती घेऊन या गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

त्यानुसार 12 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने या संदर्भातील जीआर काढला आहे.