Ajit Pawar Death: रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ; ड्रायव्हरने अजितदादांना दिला होता सल्ला, नंतर काय घडलं?

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. आता अजित दादांच्या ड्रायव्हरने एक दिवस आधी काय घडलं हे सांगितलं आहे.

Ajit Pawar Death: रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ; ड्रायव्हरने अजितदादांना दिला होता सल्ला, नंतर काय घडलं?
Ajit Pawar Driver
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 29, 2026 | 1:14 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. पण, अपघाताच्या एक दिवस आधी अजित दादांना ड्रायव्हरने सल्ला दिला होता. पण अजित दादांनी तो ऐकला नाही. आज मी माझं सर्वस्व गमावल्याची भावना चालक श्यामराव नारायण मनवे यांनी व्यक्त केल्या आहेत.

अपघाताच्या आदल्या रात्री (मंगळवारी) अजितदादांच्या गाडी चालकाने त्यांना रात्रीच गाडीने पुण्याला किंवा बारामतीला जाण्याचा सल्ला दिला होता. मुंबईतील बैठक लवकर संपल्याने चालक श्यामराव नारायण मनवे (वय ७१) यांनी दादांना सांगितले, “दादा, रात्रीच कारने निघूया, सकाळी आरामात पोहोचू.” पण दादांनी ते ऐकले नाही. त्यांनी चालकाला सांगितले, “तू पुण्याला ये, मी सभा आटोपून सकाळीच पुण्यात येतो.”

श्यामराव मनवे माध्यमांशी बोलताना भावूक झाले. ते म्हणाले, “दादा माझे दैवत होते. मी 20 जानेवारी 1999 पासून त्यांच्यासोबत चालक म्हणून काम करतोय. 2013 मध्ये मी निवृत्त झालो, तरी दादांसोबतच राहिलो. दादा माझ्या घरी गणपतीत जेवायला आले होते. सकाळी 7:30 वाजता ते मुंबईतील बंगल्यावरून निघाले आणि काही वेळातच ही भीषण घटना घडली. दादांनी माझे ऐकले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती. आता माझे आयुष्यच थांबलंय, सर्वस्व गमावल्यासारखं वाटतंय.”

अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जाहीर सभांसाठी जात होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांचे चार कार्यक्रम नियोजित होते. मात्र, विमान बारामती विमानतळावर लँडिंग करताना दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानाचा अपघात झाला. विमान धावपट्टीवरून बाजूला गेले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला.

बारामतीत अपघाताची बातमी समजताच कार्यकर्ते आणि समर्थकांचा जनसागर लोटला. अंत्यदर्शनासाठी मेडिकल कॉलेजबाहेर मोठी गर्दी झाली होती. अजितदादांच्या अचानक निघून जाण्याने महाराष्ट्राने एक कणखर, मेहनती आणि लोकप्रिय नेता गमावला आहे.