
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची 20 वाहनांना धडक
समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनरने 20 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन वाहने पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जवळपास 15 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वीकेंड असल्यामुळे वाहनांची गर्दी आहे. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे जवळपास 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रागा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. खोपोलीजवळ नवीन बोगदा आणि फूडमॉल हॉटेल दरम्यान ही घटना घडली आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, लोणावळा खंडाळा घाटातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कंटेनर अनियंत्रित झाला. या कंटेनरने पुढे असणाऱ्या अनेक वाहनांना आणि ट्रकला धडक दिली, त्यामुळे या अपघातात बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले आहे. खोपोली पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून मदतकार्य सुरु आहे.
मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज दीड ते दोन लाखांहून अधिक वाहने प्रवास करतात. शनिवारी आणि रविवारी या मार्गावर जास्त गर्दी असते. अनेक पर्यटक लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर मुंबईकडे परतत आहेत. मात्र हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.