मोदी सरकारने प्रधानांचा राजीनामा का घेतला? अभिजीत दीपकेंनी सांगितली आतली बातमी
अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. दरम्यान त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी बोलताना आता दिपके यांनी अनेक खुलासे केले आहेत.

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं, नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. या प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीने उडी घेतली आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी ( CJP) च्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन उभारण्यात आलं, तसेच संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला, दरम्यान दबाव वाढल्याने अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, या सर्व पार्श्वभूमीवर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘टिव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये बोलताना दिपके यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
नेमकं काय म्हणाले दिपके?
20 जुलै रोजी जे झालं. त्यामुळे आंदोलन मोठं झालं. दीपकेपेक्षा मोठं झालं. वांगचुक यांच्या पेक्षाही मोठं झालं. जनचळवळ ही व्यक्तीच्या भोवती नको. ती मोठी झाली पाहिजे. लाठीमार झाला, तेव्हा लोक रस्त्यावर उतरले. सरकारला कळलं प्रधानचा राजीनामा नाही घेतला तर उद्या पंतप्रधानांचा राजीनामा मागतील. त्यामुळे प्रधानांचा राजीनामा झाला. 20 जुलै रोजी जी गर्दी आली. लाठीचार्ज नंतर दुप्पट तिप्पट गर्दी वाढली. त्यामुळे लोकांचा मूड आपल्याविरोधात आहे. हे दिसलं. निवडणुकीत लोक सत्तेवरून घालवतील, म्हणून त्यांनी प्रधानांचा राजीनामा घेतला, असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आमची जी चळवळ आहे, ती जनचळवळ असेल. आम्ही जनतेच्या राजकीय मुद्द्यांवर काम करत राहणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या विषयावर आंदोलन करू. जिथे संवादाने मार्ग निघेल, तिथे संवादाने मार्ग काढू. सौरव दास हा २७ वर्षाचा झाला, तो केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करतो हे देशाच्या इतिहासात कधीच झालं नाही. प्रत्येकवेळी लोक आम्हाला असंच समर्थन करतील असं गृहित धरणार नाही. पण इमानदारीने काम करू. जे शक्य असेल ते करू. बाकी लोकांच्या हाती आहे. लोकांना वाटलं तर आमच्यासोबत येतील. त्यांना वाटलं आम्ही आधी सारखे नाही राहिलो तर नाही येतील. लोकशाहीत असंच असलं पाहिजे. भरकटणाऱ्यांच्या मागे लोकांनी जाऊ नये. जे काम करतात, ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्या मागे लोकांनी जावं, असंही यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.
