महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच खरात प्रकरणाच्या संदर्भात विरोधकांच्या टीकेला स्पष्टीकरण
खरात प्रकरणावर तुमचं मौन का? असा सवाल अंजली दमानिया यांनी आदिती तटकरे यांना केला होता. आता आदिती यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे,

सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तसेच अशोक खरातचे राजकीय मंत्र्यांसोबत असलेले कनेक्शन हळूहळू समोर येत आहे. या प्रकरणावर अनेकांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मौन बाळगल्यामुळे टीका केली होती. खरात प्रकरणावर तुमचं मौन का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता. मंत्री म्हणून अशा गंभीर प्रकरणावर तुम्ही का बोलला नाहीत? असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी, “नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर ३-४ वेळा मांडल्या आहेत. या प्रतिक्रियांच्या लिंक्स मी खाली जोडत आहे” असे म्हटले आहे.
नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे.
राज्यातील सक्षम महिला पोलीस… pic.twitter.com/XXIUfx8bmb
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 31, 2026
पुढे त्या म्हणाल्या, “महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते.”
अशोक खरात प्रकरणाबाबत
अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायलाने त्याची पोलीस कोठडी 4 दिवसांसाठी वाढवली आहे. आता अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी नवी काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.