Raj Thackeray : ‘बघून घेईन, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू’ मिसिंग लिंकवरुन राज ठाकरेंनी फडणवीसांना बरच सुनावलं
Raj Thackeray : "मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं"

दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक बाधित झाली होती. ट्रॅकवर पाणी आल्याने, दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद झाला होता. त्याचवेळी एक्सप्रेस वे सुद्धा पाण्याने भरुन गेला होता. एक्सप्रेस वे ला नदीच स्वरुप आलं होतं. म्हणून एक्सप्रेस वे वर सुद्धा वाहतूक मंदावलेली. याच दरम्यान काही हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला मिसिंग लिंकचा काही भाग कोसळला. त्यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपल्या शब्दात समाचार घेतला. “मिसिंग लिंकवर खांब कोसळला. पाणी येतंय. म्हणे त्याचं राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होता. दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं” अशा शब्दात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.
“स्वत:च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल. काय म्हणतात म्हणे, एकवेळ मला बोला. पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोकं त्या मिसिंग लिंकवर बोलतायत. महाराष्ट्राचा कुठे अपमान होतोय, पण सर्व घेऊन जायचं. केंद्र सरकारची सवय लागली. केंद्राच्या कोणत्या गोष्टीबद्दल बोललं तर तुम्ही देशद्रोही” अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘मिसिंग लिंकवरुन मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात बघून घेईन, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू’ अशा एकेरी शब्दात राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
घाण बोलणं तुमच्या टीमने सुरु केलं
“मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी. 10-12 वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केलं” असा आरोप राज ठाकरे यांनी केलं.
तेव्हा सुद्धा नैसर्गिक गोष्ट आहे, असचं बोला
“मिसिंग लिंकचं झालं. भाजपचे लोक म्हणतात नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात राजकारण आणू नका. लक्षात ठेवा. तुम्ही अमरपट्टा घेऊन आला नाही. उद्या कुणी असं केलं तर नैसर्गिक गोष्ट आहे असंच सांगा. लोकांना सांगा” अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपला सुनावलं. “झाड पडून मुलगा जातो. माणूस जातो. मुलगा गटारात पडतो. म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक. इतरांचं असल्यावर राजकारण करणार. मिसिंग लिंकवर नशीब माणसं नाही मेली. मागे मुंबई तुंबली. १००० मिलिमिटर पाऊस पडला होता. तेव्हा मुंबईची हालत झाली होती. आता ३०० ते ३५० मिलिलिटर पाऊस पडला. मुंबई तशीच. तुंबलेली. तेव्हा वारेमाप आंदोलन करायचे. आरोप करायचे” अशी टीका राज ठाकरेंनी केली.
