Chiplun Flood : पर्यावरणमंत्री असून तुम्ही काय केलं? चिपळूणकरांच्या सवालावर आदित्य ठाकरेंचा हिरमोड

आदित्य ठाकरे यांनी चिपळूणमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना चिपळूणमधील नागरिकांनी वाशिष्टी नदीतील गाळाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे.

Chiplun Flood : पर्यावरणमंत्री असून तुम्ही काय केलं? चिपळूणकरांच्या सवालावर आदित्य ठाकरेंचा हिरमोड
चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना संतप्त सवाल
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 8:17 PM

चिपळूण : मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे हाहा:कार माजलेल्या चिपळूणमध्ये आता पाणी ओसरायला आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महापुरामुळे चिपळूणकरांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. अशावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज चिपळूणचा दौरा केला. त्यावेळी त्यांना चिपळूणकरांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. आदित्य ठाकरे यांनी चिपळूणमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना चिपळूणमधील नागरिकांनी वाशिष्टी नदीतील गाळाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. मात्र, त्यावेळी त्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. (Chiplunkar’s angry question to Aditya Thackeray, Aditya Thackeray’s calm answer too)

नुसतेच तुम्ही पर्यावरणमंत्री. पण इकडे काय सुरु आहे हे पाहायला तुम्ही येतच नाही. आमचे पूल वाहून गेले आहेत. नदीत किती गाळ साचलाय. पर्यावरणमंत्री असून तुम्ही काय केलं? असा सवाल चिपळूणमधील एका नागरिकाने आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनीही शांतपणे उत्तर दिलं. मला आमदारांनी त्याबाबत सांगितलं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरच ते काम होऊन जाईल. मी आता येत राहील, असं उत्तर देत आदित्य ठाकरे तिथून पुढे निघाले. त्यामुळे पुरामुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा सामना आदित्य ठाकरे यांना करावा लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं.

‘हा पाहणी नाही तर मदत दौरा’

चिपळूण आणि महाड या दोन्ही तालुक्यात जात आहे. आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरु झालंय. पहिल्या दिवसांत आमचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था आदींनी रेस्क्यूमध्ये खूप काम केलं आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. पण आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झालीय. त्यामुळे शासनाकडून मदत सुरु करण्यात आली आहे. आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती करत आहोत. अन्य पक्षही मदत करत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत’

ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेवायची आहे. महाराष्ट्रात ते चित्र पाहायला मिळत आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठीच काही करत आहोत, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. मात्र, आता सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर आदी गोष्टी आम्ही करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं, राणेंची जहरी टीका

केंद्राकडून जाहीर झालेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही – अजित पवार