मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला; अवजड वाहनांना..
बहुप्रतिक्षित यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले. हा मार्ग 1 मे 2026 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या बहुप्रतिक्षित यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले असून, हा मार्ग 1 मे 2026 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत केवळ हलकी मोटार वाहने (LMV) आणि बस तसेच प्रवासी वाहनांनाच या नवीन मार्गावरून प्रवासाची परवानगी असेल.
या काळात मालवाहू वाहनांना या मार्गावर पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच 1 जून 2026 पासून, हलकी वाहने आणि बससाठी हा मार्ग खुला राहीलच, मात्र मालवाहू वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या निरीक्षणांनंतर घेतला जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काही कडक निर्बंधही लागू केले आहेत.
विशेषतः ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ‘हॅझमॅट’ (HAZ-MAT) वाहनांना या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील बोगद्यांमधून प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली असून, अशा वाहनांनी जुन्या अस्तित्वात असलेल्या द्रुतगती मार्गाचाच वापर करणे अनिवार्य असेल. वेगमर्यादेबाबत स्पष्ट करताना प्रशासनाने नमूद केले आहे की, या मार्गावरील बोगद्यांमध्ये हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किलोमीटर आणि बस व इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटर इतकी कमाल वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, मात्र निर्धारित वेगमर्यादेपेक्षा 5 टक्क्यांपर्यंत जास्त वेग आढळल्यास कायदेशीर सवलत मिळू शकेल. हा नवीन मार्ग सुरू झाल्यामुळे घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार असून प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या वाचणार आहे. हा आदेश 1 मे 2026 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.