
औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होता काय? असा खडा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. त्यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी केली आहे. या विषयाला सामाजिक रूप न देता त्याची कबर काढावी अशी आमच्या सर्वांची भूमिका असल्याचे लंके यांनी म्हटलं आहे. औरंगजेब समाजसेवक नव्हता असं देखील लंके यांनी म्हटलंय. तर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनंतर आता शरद पवारांच्या खासदारांनी देखील औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केल्याने कबरीवरून आता राजकारण चांगलाच तापू लागलं आहे, असं म्हणता येईल.
मंत्री विखे यांच्यावर मोठा आरोप
राज्यात सरकारच परिवर्तन झाल्यापासून अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या यंत्रणेचा वापर करून व्यावसायिकांना त्रास द्यायला सुरुवात केली असल्याचा आरोप नाव न घेता निलेश लंके यांनी केला आहे. महसूल मंत्री असताना अधिकाऱ्यांमार्फत बैठका लावून व्यावसायिकांना दंड कसा होईल अशा सूचना दिल्या गेल्या. नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह सुपा एमआयडीसीतील व्यवसायिकांची बैठक लावण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने तिथल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले असा देखील आरोप लंके यांनी केला आहे.
विखे कुटुंबियांकडून सातत्याने माझ्यावर आरोप केला जातो की, सुपा एमआयडीसीत आम्ही गुंडगिरी करतो, मात्र या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सुपा एमआयडीसी सारखं वातावरण कुठल्याच एमआयडीसीमध्ये नाही. तुमच्या परिसरात तुम्हाला एकही उद्योग आणता आला नाही आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता? असा सवाल त्यांनी विखे यांना विचारला. जर तुम्ही आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करतच असाल तर आम्ही देखील दोन हात करायला तयार आहोत…तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा अस आव्हानच लंके यांनी नाव न घेता विखेंना दिला आहे.
16 मार्च रोजी शिवनेरी गडाची स्वच्छता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करणार असल्याचा संकल्प राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो त्या राजांसाठी काहीतरी केले पाहिजे, यात राजकारण नसून प्रत्येक रविवारी गडकिल्ल्याची साफ सफाई करायची आहे…येत्या रविवारी म्हणजेच 16 तारखेला शिवनेरी गडावरून या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचे लंके यांनी सांगितले आहे. तर गड किल्ल्याचे संवर्धन करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देखील लंके यांनी केली आहे. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा संकल्प केला आहे.