वाराणसीत साईबाबांची मूर्ती आणि प्रतिमा मंदिरातून हटवले, शिर्डीत साईभक्तांमध्ये नाराजी, नेमकं प्रकरण काय?

वाराणसीत सनातन सक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबांची मूर्ती आणि प्रतिमा मंदिरातून हटवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर शिर्डीत साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाराणसीत साईबाबांची मूर्ती आणि प्रतिमा मंदिरातून हटवले, शिर्डीत साईभक्तांमध्ये नाराजी, नेमकं प्रकरण काय?
वाराणसीत साईबाबांची मूर्ती आणि प्रतिमा मंदिरातून हटवले, शिर्डीत साईभक्तांमध्ये नाराजी
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 01, 2024 | 6:56 PM

वाराणसी येथे सनातन सक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मुर्ती हटवली. जवळपास 10 मंदिरातील फोटो आणि मुर्ती हटवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला फोडणी मिळाली आहे. हिंदु धर्म शास्त्रात साईबाबांची पुजाविधी नाही. त्यामुळे साईंची पुजा करू नये, अशी मागणी सनातन रक्षक दलाची आहे. या घटनेमुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 2014 पासून साईबाबांच्या पुजेला विरोध सुरू झाला. त्यावेळचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी हिंदुनी साईबाबांना देव मानू नये आणि त्यांची पुजा करू नये, असं आवाहन केलं होतं. त्यावेळी मोठा वाद उपस्थित झाला होता. त्यावेळी शंकराचार्य यांच्या उपस्थितीत धर्म संसद भरवण्यात आली होती. त्यातही साईबाबांची पुजा करू नये, असं ठरवण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी देखील साईबाबांच्या पुजेला विरोध केला होता. आता पुन्हा वाराणसीच्या घटनेनंतर वादाला फोडणी मिळाली आहे. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ समजलं जातं. त्यामुळे साईबाबा आमच्यासाठी देव असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे.

‘ज्यांना काही गैरसमज झाला असेल त्यांनी…’

“हिंदू धर्मात संतांचा सन्मान केला जातो. साईबाबांनी कधीही आपली जात, धर्म, पंथ कोणास सांगितला नाही. साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक साक्षात्कार दाखवले. त्यामुळे साईभक्त त्यांना देव मानतात. वाराणसी येथील साईंची मूर्ती किंवा प्रतिमा हटवणे निषेधार्ह असून ज्यांना काही गैरसमज झाला असेल त्यांनी साईंबाबांच्या जीवनावर आधारित साईसतचरित्र ग्रंथ वाचावा किंवा आमच्याशी त्याबाबत चर्चा करावी. आम्ही त्यांचे समाधान करू”, असं माजी ट्रस्टी आणि ग्रामस्थ सचिन तांबे यांनी म्हटलं आहे.

‘साईबाबा हे सर्व धर्माचे प्रतिक’

साईबाबा हे सर्व धर्माचे प्रतिक होते. त्यांना काही वैदिक धर्म किंवा मुस्लिम धर्म लागत होता, असं त्यांनी कधी ठरवलं नाही. संतांना पुजनीय मानतो ही परंपरा आहे आणि त्यामुळे कर्मकांडाप्रमाणे साईबाबांची पुजा होत असल्याचं साईचरित्राचे अभ्यासक बाळा जोशी यांनी म्हटलं आहे.

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांच्या 2014 मधील साईबाबांवरील विधानानंतर साईबाबांच्या पुजेचा वाद सुरू झाला. काही काळ तो शमला देखील, त्यानंतर बागेश्वर धामचे धीरेन शास्त्री यांनी साईबाबा देव नाही. त्यांची पुजा करू नका, असं म्हटलं होतं. त्यांनंतर पुन्हा एकदा वाराणसीच्या घटनेमुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे. पण या सर्व घटनांचा साईभक्तांनी वेळोवेळी निषेध केला आणि आताही भक्तांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Follow Us