दादा आज तुम्ही… राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, फेसबुक पोस्ट चर्चेत

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अंकुश काकडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येणार होते, असा खुलासा काकडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दादा आज तुम्ही... राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, फेसबुक पोस्ट चर्चेत
ajit pawar
| Updated on: Feb 12, 2026 | 11:47 AM

“महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या धक्क्यातून राज्य अजून सावरत नाही, तोच शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलेल्या एका खळबळजनक फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमुळे अजितदादांच्या निधनापूर्वी पडद्यामागे घडणाऱ्या एका मोठ्या राजकीय घडामोडीचा उलगडा झाला आहे.

 अंकुश काकडेंची पोस्ट

अंकुश काकडे यांनी नुकतंच एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतरची पोकळी आणि त्यांच्याशी झालेल्या एका गुप्त चर्चेचा संदर्भ दिला आहे. आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज करणार होतात, असे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

 राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्लॅन काय?

अंकुश काकडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख खुद्द अजित पवार यांनीच चर्चेअंती ठरवली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेली कटुता संपवून पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे, यासाठी अजित पवार स्वतः प्रयत्न करत होते. त्या संदर्भातील अंतिम घोषणा किंवा स्वाक्षरी आज होणार होती, असे दावा अंकुश काकडे यांनी या पोस्टद्वारे केला आहे.

ankush kakade

सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व

या विलीनीकरणासाठी विठ्ठल मणियार, श्रीनिवास पाटील आणि अंकुश काकडे स्वतः मध्यस्थी करत होते, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आता त्यांचे नेतृत्व सुनेत्रा पवार करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, काकडेंच्या या गौप्यस्फोटामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे आणि भावूक वातावरण निर्माण झाले आहे. जर दादा असते, तर आज राष्ट्रवादीचा विलीनीकरणाचा इतिहास लिहिला गेला असता, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

पाहा व्हिडीओ: 

Follow Us