
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा 28 जानेवारीला अपघाती मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांचं विमान क्रॅश होऊन स्फोट झाला, त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात आहे, त्यात घातपात नाही, असं शरद पवार यांनी त्याच दिवशी म्हटलं होतं. पण आता अजित दादांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात असून तो घातपात असू शकतो, अशा संशयही काही नेत्यांनी बोलून दाखवला आहे. मात्र या मृत्यूचं कोणी राजकारण करू नका, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसावून सांगितलं आहे.
याच मुद्यावर शिवसेना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले आहेत. अजित पवारांचं कुटुब, त्यांच्या मित्रपरिवाराला , सहकाऱ्यांना काही शंका आहेत. तर फडणवीस आणि भाजपला वेदना व्हायचं कारण काय ? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. अशा प्रकारच्या घटना घडताता, तेव्हा त्यातून विविध कंगोरे निर्माण होतात असंही राऊत म्हणाले.
तुम्हाला वेदना का होतात ?
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मृत्यूवरून उठणाऱ्या प्रश्नांबद्दल चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी दाट संशय उपस्थित केला होता. अजित पवारांच्या विमानात बॉम्ब ठेवला होता का? असा संशय त्यांनी बोलून दाखवला. यावरच संजय राऊतांनी उत्तर देत मोठं भाष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, अजित पवारांचे निकटवर्तीय अमोल मिटकरंनी शंका व्यक्त केली, छगन भुजबळांना संशय येतोय, आता अजित दादांच्या कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनाही संशय येतोय. खा. बजरंग सोनावणेंनीही संशय व्यक्त केला. हा संशय येत असताना, त्याचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दम देऊन सांगत आहेत की, अजित पवारांच्या मृत्यूच कोणी राजकारण केलं तर याद राखा.. असं ते म्हणत आहेत. तुमचा काय संबंध ? तुम्ही का धमकावताय ? असा सवाल राऊतांनी विचारला. अजित पवारांचे कुटुंबिय, मित्र, सहकारी यांना जर काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय ? असा रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला.
तुमचा हात आहे का ?
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राला वेदना झाल्या, लोकं शोकमग्न आहेत, त्यांना दु:ख आहे, असं काही घडू शकेल यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये, अशा प्रकारच्या घटना घडताता, तेव्हा त्यातून विविध कंगोरे निर्माण होतात. पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की राजकारण करू नका. पण कोण राजकारण करतंय ?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे संसदेत बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतता, तेव्हा तुम्हाला (सरकार) त्यांच्या हत्येचा कट होता, असा संशय वगैरे येतो, मग ते राजकारण नाही. काहीतरी अघटित घडण्याची शक्यता होती असा संशय ओम बिर्ला आणि भाजपचे लोकं व्यक्त करत होते. पण पंतप्रधान ठणठणीत आहेत. तरीही तुम्हाला संशय येतो ना. मग आमचा एक माणूस ( अजित पवार) मृत्यू पावला आहे, त्यावरून आम्हाला जर संशय येतो, मग त्यावरून तुम्ही अस्वस्थ का होता ? तुमचा सगळ्यांचा काही हात आहे का त्यात ? असा थेट सवाल राऊत यांनी केला.