
नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार यांच्या गटाची भूमिका मांडली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून वकील मानिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. अजित पवार गटाकडून यावेळी थेट पक्षावर दावा करण्यात आला. तसेच शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला.
अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात अगदी 1968 च्या घडामोडींचा दाखला देत पक्षावर दावा केला. तसेच अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निकालाचा दाखला देण्यात आला. यावेळी शरद पवार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तरीही अजित पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन तासांच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी 9 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 ते 6 वाजेच्या वेळेत होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.
या दरम्यान, अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला आगामी काळात धक्का दिला जाऊ शकतो. कारण अजित पवार गटाकडून तसे काही महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादात मांडण्यात आले. निवडणूक आयोगाने हे मुद्दे ग्राह्य धरले आणि त्याचा विचार केला तर अजित पवार गटाच्या बाजूने निकाल लागू शकतो.
अजित पवार पक्षात बंड पुकारुन सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत अजित पवार यांच्यासह 9 जणांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली. पण जयंत पाटील यांनी केलेली ही याचिका बेकायदेशीर आहे. कारण पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील हे आमच्या बाजूने आहेत, असा महत्त्वाचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
अजित पवार गटाकडून आपल्या युक्तिवादात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तिवर आक्षेप नोंदवण्यात आला. यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्यावरही आरोप करण्यात आला. शरद पवार यांच्याकडून मनमानी केली जाते. पक्षात पक्षांतर्गत निवडणुका होत नाही. निवड आणि निवडणूक घेऊन नेमणूक करणं यात फरक आहे. केवळ एका सहीवर नियुक्ती केली जाऊ शकत नाही. जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच करण्यात आली होती, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय. त्यामुळे आमदारांची संख्या आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. महाराष्ट्रातील 53 आमदारांपैकी 43 आमदार आमच्यासोबत आले आहेत. तसेच विधान परिषदेच्या 9 पैकी 6 आमदार आमच्यासोबत आहेत. लोकसभेचे एक आणि राज्यसभेचा एक खासदार आमच्यासोबत आहे. तसेच नागालँडचे सर्व 7 खासदार आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय.
पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची 30 जूनलाच निवड करण्यात आलीय. याची माहिती निवडणूक आयोगाला 30 जूनलाच देण्यात आल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निकालाचा दाखला देण्यात आला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचा निकाल हा लोकप्रतिनिधींच्या संख्याबळच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने दिलाय. याच निकालाचा दाखला अजित पवार गटाकडून देण्यात आला.