
आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी अजित दादा हे मंत्री नसते तर काय बनले असते याविषयी देखील सांगितले आहे.
“दादांचे बालपण मामाकडे गेले”
शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दादांचे मामा हे कदम कुटुंब. ते संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा संघाचे पदाधिकारी होते. त्यांचं बालपण मामाच्या घराकडे गेलं. त्यामुळे त्यांना कार्याची जाणीव होती. दादा मात्र पवार साहेबांच्या नेतृत्वातून पुढे आले. अजितदादांनी शिक्षण घेतल्यावर टोमॅटो लागवड आणि कुकुटपालन सुरू केलं. जमिनीतून उठून मोठं होण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच सामान्य माणसांच्या अडीअडचणी त्यांना माहिती होत्या. सहकार आणि शेती क्षेत्रात काम करून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते पाहिलं तर त्यांचा भर राजकोषीय स्थैर्यावर असायचा. खर्च कमी आणि महसूल वाढी करायचे. विकासावर त्यांचं प्राधान्य असायचं. खर्चावर नियंत्रण ठेवायचं काम ते करायचे.”
मंत्री झाले नसते तर…
पुढे ते म्हणाले की, “मंत्री झाले नसते तर काय झाले असते, तर शिस्त त्यांच्या पोलिसांची आहे. ते पोलीस झाले असते. किंवा शेतकरी झाले असते. नंतर माझ्या डोक्यात आले की अजितदादा बांधकाम क्षेत्रात इंजिनियर झाले असते. उत्तमातील उत्तम काम ते करायचे. बांधकामांवर त्यांचं बारीक लक्षण असायचे. त्यावर ते लक्ष द्यायचे. प्रत्येक मालाची किंमत विचारायचे. सरकारी कामाचा एक ढाचा असतो. पण अजितदादांच्या देखरेखीत झालेली कामे अत्यंत चांगली होती. अजितदादांनी ज्या मेडिकल कॉलेजची वीट रचली त्याच मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांचा मृतदेह ठेवावा लागला. या सारखं दुर्देव नाही.”
कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा. राज्याच्या तिजोरीचा वारसा दाखवेल, पण विकास कामे थांबवणार नाही असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.